background

प्रस्तावना

मी आजपर्यंत अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहे आणि त्यापासून समाधानही लाभलेले आहे. माझे सन्मित्र श्री. वा. रा. डोईफोडे यांचे “स्वप्नांची दुनिया – अर्थ आणि विश्लेषण” हे पुस्तक प्रस्तावना लिहिण्यासाठी वाचल्यानंतर निराळाच अनुभव आला. करमणूक झाली; सात्विक स्वरुपाची; आणि माझ्या ज्ञानाच्या लॉकरमध्ये एक नवा आकर्षक अलंकार ठेवायला मिळाला. स्वप्न हे एकप्रकारचे जीवनच; त्याचा सर्वस्वी नवाच अर्थ गवसला. त्यामुळे श्री. डोईफोडे यांचा सुखद सहवास लाभला आणि त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळाली हा मोठा लाभच झाला.

अध्यात्म बाजूला सारलेले

जीवनातील कोणत्याही घटनेकडे नेहमी अध्यात्म दृष्टीने पाहावयाचे, अशी मला सवय लागलेली. स्वप्न म्हटल्याबरोबर मला सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या एका सूत्राची आठवण झाली. “संसारु म्हणिजे हा दीर्घ स्वप्नुगा.” मांडूक्य उप्निषदावरील गौडपादाचार्यांच्या कारिकांचे स्मरण झाले. त्यातल्या वैतथ्य प्रकरणात जागृती व स्वपन या दोन अवस्थांची तुलना करून, जसे स्वनातील पदार्थ खोटे तसेच जागृतीतील पदार्थही खोटे असा त्यांनी निष्कर्ष काढलेला.

“अन्तः स्थानातु भेदाना त्स्माज्जागरिते स्मृतम्

यथा तत्र तथा स्वप्ने संवृतत्वेन भिध्यते”

या श्लोकात हा निष्कर्ष मांडलेला आहे. हि अध्यात्म्गर्भ स्वप्नदृष्टी ज्ञानेश्वरीतही आढळते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील हि ओवी पाहा :

“परि मध्ये जे प्रतिभासे | ते निद्रिता स्वप्ना जैसे |

तैसा आकारू हा मायावशे | सत्वरूपी”

श्री. डोईफोडे यांनी स्वप्नाचा हा अध्यात्मसापेक्ष विचार आपल्या विवाचनाच्या कक्षेतून बाजूला सारलेला आहे. त्यांचा स्वप्नविचार हा व्यावहारिक पातळीवरचा आहे, मानसशास्त्रीय भूमिकेवरच आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आहे; आणि व्यावहारिकाना, सांसारिक जनांना लाभदायकही आहे.

गैरसमजाचे निराकरण

अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत. १. व्यतिरेक २. अन्वय. व्यतिरेक पद्धतीमध्ये आधी असताचे निराकरण केलेले असते आणि नंतर सताचे उद्घाटन केलेले असते. श्री. डोईफोडे यांनी व्यतिरेक पद्धतीचा अवलंब केलेला आहे.  या पुस्तकातील पहिले प्रकरण मोठे खुमासदार आहे. त्यात मिस्कील विनोद आहे. चिमटे आहेत. ज्यांना घेतले असतील त्यांच्या अंगी खेळाडूपणा नसेल तर ते त्यांना बोचतील; पण वाचणाऱ्यांना मात्र गुदगुल्या होतील. श्री. डोईफोडे हे तर वृत्तीनेच विनोदी आहेत. त्यांच्या विनोदात मर्मभेदकपणा आणि खेळकरपणा यांचा सुंदर संयोग झालेला आहे.

स्वप्न हा प्रकार प्रत्येक माणसाच्या परिचयाचा आहे. ज्याला आयुष्यात कधीही स्वप्न पडलेच नाही असा माणूस शोधून तरी सापडणे शक्य आहे काय? कधी स्वप्नातील दृश्ये भीतिदायक वाटतात. कधी आनंदकारक वाटतात. कधी चमत्कारिक आणि अर्थहीन वाटतात. स्वप्ने का पडतात, त्यांचा अर्थ कसा लावावा यासंबंधी अनेक गैरसमज आहेत. स्वप्नाच्या वास्तव स्वरुपाभोवती, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे, गैरसमजांचे जाळेच पसरलेले आहे. श्री. डोईफोडे यांनी सूक्ष्म अभ्यास करून या गैरसमजाचे अनेक प्रकार सोदाहरण नमूद केलेले आहेत. या सर्व गैरसमजांचे त्यांनी बिनतोड युक्तीवाद्चातुर्याने निराकरण केलेले आहे. स्वप्न आहा निसर्गाचा खेळ आहे. ते एक विलक्षण गूढ आहे. ते गूढ, त्यातील रहस्य, त्यातील अंतर्हित अर्थ उकलून दाखविण्यात श्री. डोईफोडे निश्चितच यशस्वी झालेले आहेत.

स्वप्नाची प्रायोगिक चिकित्सा

विनोदी माणूस हा बहुधा अव्यवस्थित, बेशिस्त आढळतो. श्री. डोईफोडे विनोदी आहेत, पण व्याव्स्थाप्रिय आहेत. त्यांची रचना नेटक्या शिस्तीने बांधलेली आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीचा त्यांनी अवलंब केलेला आहे. आधी अंधश्रद्धांचे निरसन मग फ्राइडच्या स्वप्नमांडणीतील अपुर्वतेचे दिग्दर्शन, मग आपल्या स्वतंत्र संशोधनाची जोड देऊन केलेले पूर्ण स्वप्नसिद्धान्ताचे मंडण. नंतर, आपला सिद्धांत यथार्थ कसा हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग. त्यासाठी त्यांनी पंधरा स्वप्ने निवडलेली आहेत. यातील काही त्यांची स्वतःची आहेत, काही इतरांची आहेत. ही स्वप्प्ने अत्यंत मनोरंजक आहेत आणि त्यासंबंधी श्री. डोईफोडे यांनी केलेला खुलासा अतिशय बोधप्रद आहे. ही स्वप्ने व त्यांचे खुलासे वाचल्यानंतर काही वाचक अंतर्मुख होतील. त्यांना वाटेल, श्री. डोइफोडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपणासही पडलेल्या स्वप्नाचा अर्थ लावणे शक्य आहे. या पुस्तकाच्या कोणत्याही वाचकास, आपणास पडलेल्या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा यासंबंधी निश्चित मार्ग दाखवण्यासाठी शेवटचे चौथे प्रकरण रचलेले आहे. अमुक प्रकारचे दृश्य स्वप्नात दिसले म्हणजे त्याचे फल अमुक, याची लांबलचक यादिच त्यांनी दिलेली आहे. ही यादी देऊन स्वप्नार्थजिज्ञासू वाचकांवर श्री. डोईफोडे यांनी मोठे उपकारच केलेले आहेत.

अभिनंदन

स्वप्न हा प्रत्येक माणसाच्या अनुभवाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. त्यासंबंधी श्री. डोईफोडे आणि या पुस्तकात केलेले विवेचन रोचक तसेच लाभप्रदही झालेले आहे. स्वप्नाचा अर्थ लावण्याची किल्ली श्री. डोईफोडे यांनी प्रत्येकाला उपलब्ध करून दिलेली आहे. स्वप्नासंबंधी मौलिक व अत्यंत उपयुक्त संशोधन लोकांपुढे सादर केल्याबद्दल श्री. डोईफोडे यांचे जितके अभिनंदन करावे तितके थोडेच होईल!


No Comments

मनोगत

मी १९४२ साली मोमिनाबादेस (आताचे आंबेजोगाई) ९व्या वर्गात प्रवेश घेतला. शाळा राष्ट्रीय. मराठी शिकवणारे शिक्षक होते, श्री. एस. आर. गुरुजी (देशपांडे). हे लुंगी नेसत असत. प्रवेश मिळताच एकदा त्यांनी आम्हा बाहेरून आलेल्या (अंबेजोगाई गावाव्यतिरिक्त) विध्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे राहण्यास सांगितले. ज्याला मराठी विषय घ्यावयाचा आहे त्याने “मी मराठी भाषेतील कमीत कमी रोज पन्नास पाने वाचल्याशिवाय झोपणार नाही” अशी शपथ घेतली तरच वर्गात बसता येईल, नाही तर नाही असे शपथपूर्वक कबूल करून घेतले. याचा एक फायदा असा झाला की वाचनाचा छंदच लागला.

१९४३ ला मेट्रिकच्या परीक्षेला बसणार होतो. परीक्षेला सहा महिने राहिले होते. त्यावेळी एक गमतीदार स्वप्न पडले, ते अजून आठवते. स्वप्नात एक प्रेतयात्रा चालली होती. त्यात मी सामील झालो. थोड्या दूरवर जात असतानाच ते चौघांच्या खांद्यावरील प्रेत लांबतच चालले. म्हणजे तिरडीच लांब होऊ लागली. खांदा देणाऱ्यानी “भूत भूत” म्हणून ओरडावयास सुरुवात केली आणि प्रेत खाली ठेवले. त्या चौघांबरोबर सर्वजण पळाले. मी मात्र एकटाच उभा राहिलो. तेवढ्यात ते प्रेत मला म्हणाले, “मला तीर्थावर अग्नी दे. कल्याण होईल.” ते प्रेत मी एकट्याने खांद्यावर पाण्याची कावड घेतात तसे उचलले आणि तीर्थावर आणले. खाली ठेवताच ते पहिल्यासारखे लहान झाले. मी अग्नी दिला. ज्वाला भडकू लागल्या. मी देवीच्या देवळाजवळील बारवेत स्नानाकरिता उतरलो तर तेथे माझी आई कपाळावर भव्य कुंकू असलेली दिसली आणि मला जाग आली.

विध्यार्थीदशा असल्यामुळे मला फक्त आपण पास होणार एवढेच वाटले. पण असे का ते समजले नाही.

पुढे नौकरी निमित्त मी परभणीस आलो. १९५८ साली प्रथम रेल्वे तांबडा उजेड फेकीत वरून खाली उतरत गेली. पुढे पुढे या रेल्वेने पिच्छा पुरवला. मी नंतर बी. ए. करण्याकरता औरंगाबादला बदली करून घेतली. रेल्वे वरचेवर स्वप्नात यायची. कोळशाचा धूर ओकीत जाणारे इंजिन वैगरे आणि या स्वप्नांनी संकटाची पूर्वसूचना दिली. माझ्या १२ वर्षाच्या मुलीची दृष्टी हळूहळू कमी होत गेली. १९६२ च्या नोव्हेंबरला मी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मुंबईस घेऊन गेलो. तेथे माझे बालमित्र श्री. लक्ष्मणराव गोगटे गे जे. जे. हॉस्पिटलचे R.M.O. होते. त्यांनी खूप मदत केली. चार दिवसात ऑपरेशन करावयाचे ठरले. ब्रेनट्युमर होता. ऑपरेशन यशस्वी झाले. परंतु ट्युमरचा प्रकार कॅन्सरचाच होता. श्री. गोगटे यांनी मुंबईहून निघते वेळी एकांतात बसून माझ्या हळव्या मनाला जपून पुढील सर्व गोष्टींची कल्पना दिली. थोडक्यात म्हणजे त्यांनी मुलीला अल्प आयुष्य आहे एवढेच सांगितले. गेलेली दृष्टी परत येणार नाही हे पण सांगितले. मुलीला अंधांच्या शाळेत घालावे म्हणून मी नागपूरला बदली मागून घेतली. १९६६ ला अती हाल होऊन मुलगी वारली.

त्याच काळात मी श्री. ज. ना. ढग्यांची पुस्तके वाचली. तशातच डॉ. सिगमंड फ्राइड पण वाचला. इतपावेतो मी माझ्याच स्वप्नाचे अर्थ स्वतःपुरते काढीत होतो. जी प्रतीके परंपरागत चालत आलेली आहेत त्यांचेच ते अर्थ तंतोतंत जुळू लागले. फ्राइड यांचे मनोविश्लेषण खूपच मौल्यवान वाटले. त्यांचे या बाबतीतले सिद्धांत डावलता येईना. पण का कोण जाणे “स्वप्नांचे अर्थ” मला खटकू लागले. मी सतत चिंतन करत असे, आणि एक दिवस सोपी किल्लीच सापडली. मी माझ्या स्वप्नातून पूर्वी स्मृतीत असलेल्या सर्व गोष्टी वजाच केल्या आणि बघितले तर काही भाग शिल्लकच. मी तेच शिल्लक भाग तपासले. तर ते प्रतीकात मोडले. त्याचा अर्थ पहिला आणि अनुभव घेतला. हा सराव अत्यंत यशस्वी झाला. मग मी लोकांच्या स्वप्नाचे याचप्रमाणे विश्लेषण करू लागलो आणि आश्चर्याची गोष्ट स्वप्नफळ शंभर टक्क्यावर गेले.

निवृत्त झाल्यावर सहा वर्षांनी मी स्वप्नावर लेख लिहिला. तो नागपूर पत्रिकेत छापून आला. माझा तो पहिलाच लेख. खूप आनंद झाला. नंतर मी श्री. दिनकर देशपांडे यांना भेटलो. त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. “”जेवढे लिहायचे असेल तेवढे लिहा. आम्ही आहोत” या वाक्यामुळे मी पुढे लिहित गेलो. मालिका संपली. मी आता स्वप्नावर पुस्तकच लिहिण्याचा विचार करू लागलो. एके दिवशी मी सर्व छापील लेख घेऊन आदरणीय प्राध्यापक श्री. अ. ना. देशपांडे यांच्याकडे गेलो. त्यांना सर्व लेख वाचून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. दहा दिवसांनी भीतभीतच त्यांच्याकडे गेलो. त्यांना सर्व लेख खूप आवडले. त्यांनी मार्गदर्शन केले आणि मी हे पुस्तक पूर्ण केले. आदरणीय श्री. अ. ना. देशपांडे यांनी प्रस्तावना दिली. त्यांनी मला वाचून दाखविली. मी गदगदून गेलो. कारण तो माझ्या आयुष्यातील जन्मसाफ्ल्याचा दिवस होता.

ऋणनिर्देश :- नागपूर पत्रिकेचे श्री. दिनकर देशपांडे यांचे प्रोत्साहन, प्रा. श्री. प्रभू ठाकरे यांचे संदर्भ ग्रंथांकरता लाभलेले सहाय्य आणि मार्गदर्शनपर सूचना आणि आदरणीय डॉ. अ. ना. देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे जर मिळाले नसते तर स्वप्न साकार झालेच नसते. प्रकाशनाबाबतच्या सहकार्याबद्दल सौ. शैलजा काळे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. माझे हस्तालिखित संस्कारित करून ते मुद्रित करण्याचे कार्य श्रीनिवास मुद्रणालयाचे श्री. श्यामकांत बनहट्टी यांनी केले. त्यांचा मी आभारी आहे.

सर्वांचा ऋणी –

वा. रा. डोईफोडे


1 Comment

माझी भूमिका

नोव्हेंबर १९८९ या वर्षी श्री. वा. रा. डोईफोडे यांचे “स्वप्नांची दुनिया – अर्थ आणि विश्लेषण” हे पुस्तक प्रकाशित झाले. एकूण २००० प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त दोनच राहिल्या. श्री. वा. रा. डोईफोडे म्हणजे माझे आजोबा, मी त्यांना आबू म्हणत असे. लहानपणापासून ते वयाच्या १४व्या वर्षापर्यंत माझे “आबू” माझा सच्चा आणि जवळचा दोस्त/मित्र होते. २९ नोव्हेंबर २००६ ला “आबूंनी” या जगाचा निरोप घेतला आणि माझा “सच्चा मित्र” हरपला. एकटेपणा वाढला. त्यातच मोठी बहिण शिक्षणासाठी लंडनला गेली. आईची शाळेची नोकरी, बाबांची जाहिरात विश्वातील व्यस्त दिनचर्या, जोडीदाराच्या मृत्यूने दुःखात बुडालेली, घाबरलेली आजी या साऱ्या गोष्टींमुळे आबूंची उणीव आणखीनच वाटू लागली. त्यावेळी मी इयत्ता नववीत शिकत होतो. अभ्यासातील प्रगती नेहमी चिंताजनक होती. २००७ च्या फेब्रुवारी महिन्यात मी बाबांबरोबर वैष्णवदेवीला गेलो, तेव्हा बाबांना एक स्वप्न पडले. ते त्यांनी परतल्यावर आईला सांगितले. मी तिथेच होतो, पण गंभीरपणे विचार करणे हे माझे विश्वाच नव्हते. मी सहज ऐकायचे म्हणून ऐकले. बाबा सांगत होते – मी आणि बाबा दोघेच जण एका विमानातून जात होतो. थोडे दूर पर्यंत विमान नित गेले आणि थोड्या वेळाने काट्याकुट्यांच्या झाडी मध्ये जावून अडकले. थोड्या वेळाने ते विमान आपोआपच त्यातून बाहेर पडले व सुरळीत प्रवास करून योग्य त्या विमानतळावर जाऊन उतरले. यावर आई पटकन म्हणाली, “श्रेयसच्या दहावीचे टेन्शन घेऊ नका. तो सहज पास होईल.” स्वप्नांची दुनिया “साहेबच्या” (आबूंच्या घरी त्यांना सर्व साहेच म्हणत) पुस्तकाचा फायदा – आई पुढे म्हणाली. “या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करावं अशी साहेबची इच्छा होती. बघू कधी जमतंय ते.” तो विषय तिथेच संपला. मी दहावी खरंच सहज पास झालो. कुठेतरी सुप्त मनात ‘पुस्तकाचे भाषांतर’ हे वाक्यच कोरले गेले. पुढे शिक्षणात थोड्या अडचणी आल्या व शैक्षणिक विमानाला योग्य विमानतळ गाठणे कठीण होऊ लागले. बी.एस.सी.एनीमेशनला प्रवेश घेतला. आता डिग्री पूर्ण होईल या शिक्षणाचा फायदा आला की आबूंच्या पुस्तकाची वेबसाईट तयार करण्याच्या संकल्पनेची पाळमुळ रोवली गेली. आबूंचीच नव्हे तर माझ्या सच्च्या मित्राची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो.

‘स्वप्न्शास्त्राकडे’ बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठी हा प्रयत्न. पुस्तक खरेदी करून वाचणारा मराठी वाचक हळू हळू दूर होत चालला आहे. पण इंटरनेट वर बसून मराठी साईट वरील माहिती गोळा करण्याचा प्रयास करणारा गट वाढतोय. या इंटरनेट वाचकांतर्फे आबुंनी मांडलेले हे स्वप्न्शास्त्र सामान्य वाचकांपर्यंत पोहोचले हे उद्दिष्ट.

या वेबसाईटच्या यशासाठी परमेश्वराचे आशीर्वाद, आजी-आजोबांचे शुभाशीर्वाद, आईबाबांचे प्रोत्साहन, ताई-जीजींच्या शुभेच्छा, मित्रमैत्रिणींचा पाठींबा मला लाभला. या साऱ्यांचा मी ऋणी आहे.

धन्यवाद!

– श्रेयस अनिल डोईफोडे


No Comments

माझे आजोबा

मूळ गाव – हिंगोली, जिल्हा परभणी, मराठवाडा

जन्म – १३ मे १९२२

शिक्षण – एम. ए. – १९४३ साली मेट्रिक

१९५८ – वयाच्या ३६व्या वर्षी बी.ए. ची पदवी

१९६६ – एम.ए. ची पदवी

नोकरी/व्यवसाय – १९८० साली विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त – नोकरी निमित्ताने हिंगोली, परभणी, औरंगाबाद, नागपूर व मुंबई या ठिकाणी कार्य

छंद/आवड – नाट्यप्रेमी, साहित्याची आवड, वाचनाची आवड, अभ्यासू वृत्ती, गप्पा मारणे, ऐतिहासिक घटना सनावळीसह जपणारे, रंजकतेने व्याख्यान खुलविणारे, मुखोद्गन असलेले, विनोदीवृत्ती जपणारे, पुस्तकाच्या प्रकाशानासह अनेक ठिकाणी व्याखाने, ज्येष्ठ नागरिक संघ, मुंबई-नागपूर-औरंगाबाद येथील पदवी महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, सुंदर व सुवाच्य हस्ताक्षर, लेखनाची आवड, ‘नागपूर पत्रिका’ या वर्तमानपत्रात स्तंभलेखन. ‘रोज पन्नास पाने वाचणारच’ ही घेतलेली शप्पथ अंतिम श्वासापर्यंत पार पाडणारे.

स्वप्नांवरचा अजून बराच अभ्यास करावयाचे स्वप्न अर्ध्यावरच सोडून गेलेले माझे आजोबा यांच्या वयाच्या ७५व्या वर्षी रौप्यमहोत्सव व २००४ साली ८१व्या सहस्वचंद्रदर्शन सोहळा संपन्न झाला. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या लेखक, व्याख्याता, वक्ता, विनोदाचार्य आजोबांचा मृत्यू दिनांक २४ नोव्हेंबर २००६ साली झाला.

टीप: आजोबांनी लिहिलेल्या या पुस्तकाला १९८९ साली छापील स्वरुपात प्रकाशित करताना अनेकांचे हातभार लागले. मा. श्री. श्या. श्री. बनहट्टी यांच्या श्रीनिवास मुद्रालयात याचे मुद्रण झाले तर प्रकाशनाचा भार ज्ञानेश प्रकाशनाच्या प्रकाशक मा. सौ. शैलजा काळे यांनी सांभाळला. “स्वप्नांचा दुनियेतील” सर्व गोष्टीचा परामर्ष घेऊन या पुस्तकातील स्वप्न्शास्त्राला लिखित पाठींबा मा. प्रा. श्री. अ. ना. देशपांडे यांनी आपल्या प्रस्तावनेतून दिला. या साऱ्यांच्या सहकार्यामुळेच आजोबांचे पुस्तक छापील स्वरुपात प्रसिद्ध होऊ शकले. आज या सर्वांच्या मुळेच मला ही वेबसाईट तयार करता आली. आपले आशीर्वाद पाठीशी आहेतच. मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे.

आता संपूर्ण पुढील भाग आजोबांच्या छापील पुस्तकाप्रमाणेच.

– श्रेयस अनिल डोईफोडे


No Comments

स्वप्न विश्लेषण कशे करावे?

स्वप्ने साऱ्यांनाच पडतात. स्वप्न न पडलेला माणूस विरळाच. काही लोकांना हा नित्याचाच आनंद तर काहींना अधूनमधून याचे दर्शन; पण स्वप्न म्हणजे काय? असे कोणी विचारले तर त्याचे नेमके उत्तर सापडणार नाही. भिन्न भिन्न प्रकारांनी, तत्त्ववेत्त्यांनी आपआपल्यापरी भिन्न भिन्न प्रकारे उत्तरे दिली आहेत. संस्कृत पंडितांनी अगडबंब शब्द वापरून त्याला तत्त्वज्ञानाची पुटे चढविली. तर काहींनी इंग्रजीचे संस्कृतमय मराठीत भाषांतर करून “ठोकून देतो ऐसाजे की” असा प्रकार केला. साध्या व सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर असे सांगता येईल की, स्वप्न एक असा चित्रपट की ज्याचा निर्माता कोण – माहीत नाही, दिग्दर्शक कोण – माहीत नाही, कलाकार कोण – माहीत नाही – कथालेखक कोण – माहीत नाही, संगीतकार माहीत नाही – कथानक माहीत नाही – कोठले दृश्य पाहावयास मिळणार – माहीत नाही. याला प्रेक्षक फक्त एकच लागतो. त्याला हा चित्रपट बघण्याकरता तिकीट काढावे लागत नाही. फक्त ज्याला हा चित्रपट “बघावयाचा आहे” तो प्रेक्षक “झोपलेलाच” पाहिजे हा अलिखित नियम. बघा, तुम्हाला पण पटली ना ही सुटसुटीत पण थोडी गुटगुटीत व्याख्या.

स्वप्न एक महान चमत्कार आहे

तसे थोडे खोलात जाऊन बघितले तर आपणास आढळून येईल की स्वप्न एक चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे काय? निसर्ग ज्यावेळी आपले गुणधर्म बदलतो त्यावेळी आपण त्याला चमत्कार म्हणतो. विस्तवाचा गुणधर्म पोळने-जाळणे हा आहे. पण कोणी म्हणेल की श्री. पु. ल. ला पद्मश्री मिळताच विस्तवाने त्यांना पोळने सोडून दिले आणि पु. ल. शेगडीतले खवखवणारे निखारे काडकाड सुपारी खाल्ल्यासारखे खातात, तर आपणांस हा फार मोठा चमत्कार वाटेल. पण असे होणे कालत्रयी शक्य नाही. माणसांनी केलेल्या समाजकार्याला किंवा किमान संशोधनाला बक्षीस म्हणून किंवा देणगी म्हणून घ्यायची निसर्गाची प्रथा नाही. कधी असं झालंय का की १२० तरुण-तरुणी “भारत जोडो” करता सायकलवर श्री. बाबा आमटे यांच्याबरोबर भारतभर फिरून आले आणि या महान कामगिरीवर प्रसन्न होऊन विस्तवाने त्यांना “पोळने” सोडून दिले. बुध्दीमान आणि तडफदार तरुणांनी हुंडा घेतला नाही एवढ्या अचाट कामावर खुष होऊन विस्तवाने त्याला पोळणे सोडले आहे असे कधीतरी आणि कोठेतरी घडले आहे? कवींनी क्रांतिकारक कविता रचल्या, नाटककारांनी समाजाच्या दांभिकतेचे वाभाडे काढले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवाबाजी उघड करून भांडाफोड केला तरी यापैकी एकावरही निसर्गाने कृपा करून आपला नियम तोडल्याचे दाखवता येणार नाही. काही माणसं दगडातून देव निर्माण करतात तर काही जण देवाला फोडून परत दगड करतात; परंतु यापैकी कोणीही “अमर” झालेला नाही. ‘जन्माला येणारा प्राणी मरणार’ हा निसर्गाचा अलिखित नियम. मग माणूस जन्मभर गोमूत्र प्यायला काय आणि दारू प्यायला काय, दोघानाही मृत्यू निश्चितच. निसर्गाजवळ अपवाद नाहीच. असो. अधिक भारुड न लिहिता “खोगीर भरती” टाळतो.

इतके जरी असले तरी निसर्ग स्वतःच खेळकर असल्यामुळे स्वतःच ‘चमत्कार’ करून माणसाला खेळवतो – रिझवतो – तसाच तो त्याला विचार पण करावयास लावतो. अन् तेही स्वप्न दाखवून. कसे ते पाहू या.

तुम्ही झोपला आहात. तुमच्या स्वप्नात तुम्हास हेमा मालिनी दिसते. ती दरवाजातून आत येत असताना तिच्या पायातील घुंगरांचा मंजुळ आवाज तुम्हाला सुखद वाटतो. ती तुमच्या पलंगावर येऊन बसते व आपल्या जवळील अत्तराचा फाया तुमच्या हाताला फासते. तुम्ही हात हुंगून सुगंध घेऊन तृप्त होता. ती आलिंगन देण्याकरिता दोन्ही हात तुमच्या गळ्याभोवती टाकते अन् तुम्ही जागे होता.

आता सांगा, जड स्वरूपात समोर नसताना हेमा मालिनी ‘बघितली’ ते डोळे कोणते होते? जड स्वरूपात फक्त घुंगरू तुम्ही बघितले, पण त्यातून ध्वनी निर्माण न होता तुम्ही मंजुळ आवाज ऐकला ते कान कोणते होते? ती जड देहाने नसताना तुम्ही तिला आलिंगन द्यावयास निघालात तो देह कोणता होता? येथे निसर्गाने आपणहून (म्हणजे त्याच्या स्वेच्छेने) आपले सर्व अलिखित नियम तोडून एक चमत्कार माणसास दाखवला. डोळ्याचा गुणधर्म फक्त जड वस्तू ‘बघणे’ अन् तीही डोळे उघडे असताना. कानाचा धर्म निर्माण झालेला ध्वनी ‘ऐकणे’, जर ध्वनी निर्माण झाला तर. नाकाचा धर्म श्वास घेणे व गंध जाणणे, गंध असल्यास. येथे सर्व अवयवांनी सर्व नियम धुडकावले आहेत. जड वस्तू नसताना झोपेत हेमा मालिनी डोळ्यांनी बघितली. पायात घुंगरू नसताना पण ध्वनी निर्माण न होताही कानांनी निर्माण न झालेला ध्वनी ऐकला. अक्षरशः सुगंधी द्रव पदार्थ शरीराला न चोळताही द्रवपदार्थांचा त्वचेने स्पर्श न होताही सुगंध घेतला. देह समोर नसतानाही देहाने आलिंगनासाठी घेतलेली धाव. सारे कसे चमत्कारात मोडते. झोपेत असताना ‘बघतो’ पण झोपेत असताना कोण जागे होते हे सांगता येत नाही. सर्वसाधारण नास्तिक एक ठराविक मुद्दा मांडतात. ‘ईश्वर आम्ही डोळ्यांनी बघू, नंतरच मानू.’ इथे तर खरे म्हणजे तर्कदुष्टताच आली आहे. जी वस्तू डोळ्यांनी दिसत नाही ती ‘पाहण्या’चा अट्टाहास हाच मात्र पाहण्यासारखा आहे. ते एवढ्यापुरतेच बोलतात. मग मी त्यांना वरील स्वप्न रंगवून सांगतो आणि विचारतो, “माझ्या नास्तिक मित्रांनो, तुम्ही झोपले असताना हेमा मालिनी बघितली, ते डोळे, निर्माण न झालेला घुंगरांचा ध्वनी ऐकणारे कान, त्वचेला स्पर्श न होतही घेतलेला सुगंध आणि जड देह पलंगावर पडलेला नसतानाही आलिंगनाकरता धावणारा देह जर तुमच्या देहातून मला द्याल तर मी कोठेही परमेश्वर दाखवू शकेन.” परत नास्तिक आले नाहीत व पुढे कधी येणार नाहीत.

स्वप्ने का पडतात?

माणसाला नियमित व अनियमित स्वप्ने पडू लागली आणि त्याला हे काहीतरी आगळे वेगळेच वाटायला लागले आणि तो त्याची कारणे शोधावयास लागला. कुठे कुठे घडणाऱ्या पुनरावृत्तीमुळेच स्वप्ने पडत असावीत असेही त्यास जाणवू लागले.

Swapnanchi-Duniya-1

 

तसे पाहिले तर स्वप्न न पडलेला मनुष्य दुरापास्तच. माणसाला झोपेतच स्वप्न पडतात हा एक निसर्गाचा विलक्षण चमत्कारच आहे. तो प्रत्येक मनुष्य अनुभवीत असतोच. स्वप्नं का पडतात याचं निश्चित उत्तर कोणीच समाधानकारक देऊ शकलेलं नाही. तत्त्ववेत्ते, डॉक्टर यांनी आपआपल्या परीने कारणे दिली आहेत. ती सर्वस्वी कोणासच पटण्यासारखी नाहीत. यांचे काही वानगीदाखल नमुने –

  • मेंदूमधील ज्ञानतंतूचे मलूल अवस्थेत जाणे म्हणजे झोप या अल्पशा हालचालीने मलूल अवस्थेचा नाश होऊन प्राप्त झालेली चेतना ते स्वप्न.
  • मेंदूची झोपेतील चंचलता तेच स्वप्न.
  • इंद्रिय विज्ञान्शास्त्राप्रमाणे पोटाच्या अपचनाची झोपेतील जाणीव, तेच स्वप्न.
  • शरीरशास्त्राप्रमाणे मेंदूत रक्तप्रवाह वाढवण्यास झोपेत आलेला अडथळा अंशतः दूर होणे म्हणजेच स्वप्न.
  • मानसशास्त्राप्रमाणे स्वप्न म्हणजे ताबा असलेल्या किंवा नसलेल्या आठवणींचा भास.
  • झोपेत मनच सर्व बनते ती स्थिती म्हणजे स्वप्न.
  • जीवाने परलोकात जाणे म्हणजे स्वप्न.
  • विवेकशील मनाचा लय झाला असता विवेकशून्य मनाचे वावदूक वावरणे ते स्वप्न.
  • अंतरमनापासून किंवा जागृत मनापासून आलेले ठसे, देखावे किंवा सुचना अंतरमनाने थोडे फेरफार करून अथवा जसेच्या तसेच झोपेत बाहेरील मनासमोर नाचविणे त्याला स्वप्न म्हणतात.
  • दैवी जगत्प्रपंच म्हणजे स्वप्न.

(स्वप्न भविष्य- ले. श्री. कै. दत्तात्रेय ज्योतीपंत कुळकर्णी)

काहीच्या मते स्वप्ने हि केवळ अपचनामुळेच पडतात, परंतु हे सर्वस्वी खरे ठरत नाही. केवळ अपचन झाल्यामुळे स्वप्ने पडली असती तर ज्याला अपचन होत नाही त्यांना स्वप्न पडलीच नसती, पण तसे होत नाही. म्हणून या विधानास काहीच किंमत देता येत नाही.

एक वर्ग असा आहे की, जो स्वप्न हा एक जागृत मनाचा खेळ आहे असे मानतो. निद्रावस्थेतील मेंदूची ती एक चलनवलन प्रक्रिया आहे. या शिवाय त्याला काही अर्थ नाही. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” असे म्हणून ते मोकळे होतात; पण हेही बरोबर नाही. यातील से ला से जुळल्यामुळे अर्धवट समाधान होते, पण यात विज्ञान्दृष्ट्या आणि तर्कशास्त्रदृष्ट्या काहीच अर्थ नाही. दिवसभरातील घडामोडी मना वसतातच. म्हणून त्या सर्व स्वप्नात येतात का? नाही. म्हणजेच केवळ मनात वसलं म्हणून स्वप्नात दिसलं असे म्हणता येत नाही. आता हेच विधान दुसर्या उदाहरणावरून सहज खोडता येईल. या वर्गातील लोकांना जर विचारलं की, साप तुमच्या मनात वसला होता का? वाघ तुमच्या मनात वसला होता का? विष्ठा तुमच्या मनात कधीतरी वसली होती का? महारोग तुमच्या मनात वसला होता का? या सर्वांचं उत्तर निश्चितच नकारार्थी आहे आणि इतके स्पष्ट असूनही साप-विष्ठा-वाघ-महारोगांनी पिडलेला माणूस तुमच्या स्वप्नात येतातच. म्हणून वरील कविकल्पना हि वायफळ ठरते, त्यात तथ्य नाही.

Swapnanchi-Duniya-2

एक दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्या मते स्वप्न म्हणजे केवळ आभास. त्यात काही खरे नसले तर मग अर्थ कोठला आणि भविष्य कोठले? स्वप्नात येणाऱ्या वस्तू या खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिजवळ येत नाहीत हे खरे. याबद्दल दुमत नाही. डोळे बंद असताना आपण “पाहतो” हा मोठा चमत्कार आहे. डोळे बंद असताना पाहिलेल्या वस्तू-दृश्य-आपल्याजवळ असावीत असे यांना म्हणावयाचे आहे काय? असे जर असेल तर डोळ्यांनी बघितलेले असंख्य-तारे-सूर्यचंद्र-मोटारी-विमान आणि असंख्य माणसे सर्व त्या माणसाजवळ कुठे असतात? आता माणसाकडे जरा चिकित्सक दृष्टीने बघा. तो आपल्या जड डोळ्यांनी फक्त “जड” वस्तूच पाहू शकतो. अदृश्य वस्तू नाही. तो चालता बोलता मनुष्य पाहू शकतो, पण त्यातील “चैतन्य” पाहू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजेचा बल्ब. जो जळताना मनुष्य बघू शकतो. त्याचे डोळे तेवढेच दाखवतात पण त्यात असलेली वीज तो आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. फक्त ती तो ज्ञानाने जाणू शकतो. डोळे बंद असताना म्हणजेच झोप लागली असतानासुद्धा देहातील डोळ्यांनी स्वप्न पाहिले जाते. जागृत अवस्थेत कोणी डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहू शकत नाही. फक्त स्वप्न रंगवू शकतो. अर्थात “रंगवलेली स्वप्ने” आणि “पडलेली स्वप्ने” यातला फरक वाचकाला अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. “स्वप्न हे खरं नसतं व त्यात काही अर्थ नाही” असे म्हणतेवेळी मजेदार चूक होऊन जाते. माणूस झोपलेला असतो आणि पडत असलेले स्वप्न पूर्णपणे “बघत” असतो. जागा झाल्यावर तो स्वप्न सांगू शकतो. नव्हे सांगतोच. पडलेले स्वप्न हे खरे असते आणि तो खरे पाहिलेले “स्वप्न” अगदी खरोखर सांगतो आणि नंतर म्हणतो, “स्वप्न काही खरे नाही. तो निव्वळ आभास आहे.” आता पाहा, खरे पाहून ते काही खरे नाही म्हणणे आणि पाहून “आभास” म्हणणे म्हणजे केवळ विनोद!

डॉक्टरांनी आपल्या व्याव्सायानुरूप व शास्त्रानुसार स्वप्नास शारीरिक तसेच मानसिक रोग किंवा विकृती कारणीभूत ठरतात असा एक सर्वसाधारण ठोकताळा सांगितला. तर ज्योतिषी मंडळींनी स्वप्नाचा संबंध ग्रंथांशी असल्याचा निर्वाळा(!) दिला. कै. दत्तात्रय कुळकर्णी यांचे एक पुस्तक “स्वप्न भविष्य” या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. या पुस्तकात ते लिहितात, “स्वप्नाशी ज्योतीषशास्त्रदृष्ट्या ग्रहाचा संबंध कसा असतो व कितपत असतो हे सांगणे जरुर आहे. स्वप्नाचा संबंध गुरु व नेपच्यून या दोन ग्रहांशी निगडीत आहे आणि गुरु, नेपच्यून, बुध, मंगळ यांचा शुभयोग असला तरच सूचक स्वप्ने पडू शकतात.” या विचाराचे खंडण करणे फार सोपे आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वप्न पडते त्या व्यक्तीची पत्रिका “स्वप्नास” माहीत असायलाच पाहिजे. ज्याच्या कुंडलीत गुरु, मंगळ यांचा शुभयोग असेल अशाच्याच स्वप्नात “स्वप्नांनी” जायला पाहिजे. म्हणजे “स्वप्नासच” ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. तर्कशास्त्रदृष्ट्या या गोष्टीला, विधानाला काहीही किम्मत देता येत नाही. थोडक्यात याल एक “बामणी बंडल” म्हणता येईल.

येईपर्यंत आपण स्वप्नाची कारणमीमांसा बघितली, परंतु खरे सांगायचे तर न तुम्हाला काही पटलय, न मलाही. याचे कारण काय असावे याचा मी खूप विचार केला आणि मला याचे एक “कारण” आपोआप सापडले.

कोणालाही स्वप्न स्वेच्छेने पडत नसतात. ती एक निसर्गाची प्रभावी लहर आहे. त्याचे कारण शोधणे व्यर्थ आहे.

काही भ्रामक कल्पना

स्वप्नाच्या बाबतीत काही भ्रामक कल्पना बऱ्याच जणांच्या आहेत. त्यापैकी काही कल्पनांचा परामर्श घेऊ.

  • सूर्योदयापूर्वी स्वप्ने खरी ठरतात. ही एक अत्यंत सर्वसामान्य (सर्वांनी माना डोलाव्ल्यामुळे) कल्पना आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सूर्य एक ज्योत आहे. हि ज्योत कधी विझत नाही. म्हणजे सूर्य कधी मावळतच नाही तर उगवण्याचा प्रश्न येतोच कोठे? तो फक्त भौगोलिक भूमिकेनुसार दृष्टिआड होतो ऐवढेच. मग सकाळ म्हणजे काय? सूर्योदय म्हणजे काय? हे स्वप्नाच्या भाषेत समजण्याकरता माणसाने आपली झोप मोजून ठेवली पाहिजे. आता झोप मोजायची कशी? समजा तुही ११ ला झोपत असाल आणि तुम्हाला पहिली जाग जर ६ ला आली असेल तर ११ ते ६ हि तुमची खरी रात्र. ६ ला जाग येणे हा तुमचा सुर्योदय. पंचांगात सूर्योदयाची वेळ काहीही असो. त्याच्याशी तुमचा आणि तुमच्या झोपेचा काडीचाही संबंध नाही. फक्त तुम्ही निजतेवेळी घड्याळ बघायचे आणि जाग येताच घड्याळ बघायचे एवढेच. आता स्वप्न तुम्ही घड्याळाप्रमाणे क्रमवार लक्षात ठेवा. शक्य झाल्यास लिहून ठेवा. आता कोणत्या वेळी काय दिसले याकरिता उलट्या क्रमाने (Anti-Clockwise) जा. म्हणजे तुम्हास स्वप्नातील “सूचक” भागाची वेळ काढता येईल. स्वप्नातील सूचक भाग कसा ओळखावा हे दुसऱ्या भागात तपशीलवार दिले आहे.
  • “स्वप्ने भविष्य सांगतात” हे छोटे पुस्तक आहे.
  • चांगले स्वप्न पडले आणि जर झोप उघडली तर झोप येऊ नये कारण त्याचे इष्ट फळ प्राप्त होत नाही. हे सपशेल खोटे आहे. जर स्वप्न सूचक असेल तर त्याचा परिणाम हा कधीही बदलत नाही. एवढे लक्षात घ्या. मग तो चांगला असो वा वाईट. निसर्गाची सुचना मिळताच, मग तो मनुष्य जागा राहतो का पुन्हा झोपतो, गोमुत्र पितो, शाकाहार घेतो का मासाहार, देवळात जातो का नाही. मग बदल कुठला? अशा रीतीने या गोजिरवाण्या बंडलाची विल्हेवाट लागते.
  • वाईट स्वप्न पडले की नंतर अवश्य झोपावे म्हणजे वाईट काळाचा नाश होतो. हे बंडल वरील पहिल्या बंडलाचे मूर्ख भावंड आहे. म्हणून यावर अधिक लिहिणे नको.
  • स्त्री किंवा लहान मुले यांना स्वप्नाचे वर्णन करून सांगू नये. लहान मुलांचे एक वेळ समजू शकते; पण “स्त्री” जातीला स्वप्न सांगू नये म्हणजे शुद्ध वेडेपणाच आहे. आता स्त्रिया डॉक्टर होतात. तेव्हा त्यांना डॉक्टर या नात्याने या “रोग्याची” चांगली ओळख झालेली आहे. आपल्याकडे अजून याचा अभ्यास असा कोणी केला नाही. रशियात मात्र एका बाईने संशोधन करून यावर पीएच.डी. मिळवली आहे. तेव्हा या भंकस विधानाची दाखल न घेतलेली बरी.

एक गैरसमज असाही आहे की, दिवसा पडलेली स्वप्ने खरी होत नसतात. खरे म्हणजे स्वप्न केव्हा पडते याला महत्त्व नाही. फक्त ते सूचक आहे का नाही हे म्हत्वाचे आहे. आपण दुपारी झोपलो तर “झोपेला” ही दुपार आहे का रात्र आहे, याचा विधिनिषेध नसतो. झोप आली आणि नंतर स्वप्न पडले तर ते दिवसा का रात्री हे म्हत्वाचे नाही. (पुढील भागात सूचक स्वप्नाबद्दल तपशीलवार लिहिले आहे.) “स्वप्नभविष्य” या पुस्तकात भितीप्रद स्वप्ने, प्रतिकूल संवेदनाची वाईट स्वप्ने तशीच अनिष्ट फलदायक स्वप्ने, यांचा मनुष्याच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून प्राचीन आचार्यांनी दुःस्वप्न – शांती व अनिष्ट फळ परिहाराचे विधी सांगितले आहेत. “ब्राह्मणाकडून रात्रीच प्रयत्नाचे होम करून उक्त विधीने तुपाने मिश्रित अशा पायसाचे (दूध किंवा दुधाची खीर) हवन करावे. उक्त विधीने म्हणजे ज्याचे त्याचे रीतिरिवाजाप्रमाणे विधी असे समजावे. कुलदेवता अगर विघ्नहर्ता गजानन अगर शंकर याचे समोर अंघोळ करून निरांजन लावावे व नारळ फोडावा. मग शिवकवच, विष्णूसहस्त्रनाम, लक्ष्मीस्तोत्र, नवग्रहस्तोत्र वाचावे. विचित्र स्वप्नाचे शांतीसाठी व परिहारासाठी विनायकी चतुर्थीव्रत करावे. जुन्या काळच्या नियमानुसार जो कोणी उपाध्याय असेल त्यास यथाशक्ती दक्षिणा, वस्त्रे, गायी, सोने वैगरे शांतीफल प्राप्तीसाठी द्यावीत.”

वरील पूर्ण परिच्छेद बारकाईने वाचल्यास अंधश्रद्धा कशी तर्कदृष्ट्या सिद्धांतावर कलाकुसरीने बसवली आहे याचा सुंदर नमुना म्हणून याकडे बघावे लागेल. गणित अगोदरच चूक करून ठेवायचे आणि नंतर ते “बरोबर” येण्याकरता वरील प्रमाणे जपजाप्य करावे आणि गणित चुकले तरी आता आपोआप वारोवर होऊन शंभरपैकी शंभर गुण मिळणारच अशा विश्वासाने झोपणार्या विध्यार्थ्याची काय दश होऊल हे काय सांगावयालाच पाहिजे काय? याला अधिक खुलासेवार करून सांगितल्यास यावर आणि अशा वार्याच तर्कदृष्ट कल्पनांवर प्रकाश पडून त्या दूर होतील असा विश्वास वाटतो.

पहिली गोष्ट म्हणजे आजतागायत कोणत्याही आचार्यांनी “दुःस्वप्न” म्हणजे काय हे कोठेही सांगितले नाही. फक्त सर्व विद्वान आचार्यांनी शुभ आणि अशुभ या दोन कोटीतच फले सांगितली आहेत. शुभ स्वप्न सांगताना सर्वांनी (सर्व धर्मात) पांढरा रंग, काही प्राणी आणि पांढऱ्या वस्तू या “शुभ” मध्ये घातल्या तर “अशुभ” मध्ये कावळा, काळा व लाल रंग, गाढव, माणूस घसरून पडणे यांना स्थान दिले. येथे कोणीही “वाईट स्वप्न” कोणते? हे सांगितले नाही. स्वप्न वाईट का स्वप्नाचा परिणाम वाईट या बद्दल विश्लेषण नाही. सर्व साधारणतः स्वप्नात काही वाईट घटना/कृत्ये दिसली की ती “दुःस्वप्न” या सदरात टाकायची व त्याचा “इलाज” सांगितलेल्या पद्धतीने करायचा एवढे आपण आजपर्यंत बघत आलो. आपली चूक आपणास कधी कळलीच नाही. उदाहरणार्थ, समजा एक तरुणास, त्याची आई हयात नसताना, मातृसंभोग घडला तर तो माणूस निःसंशय घाबरून जाईल. आपणास पडलेले स्वप्न निसंशय दुःस्वप्न आहे असे गृहीत धरून तो ब्राम्हणांकडे जाईल. ब्राह्मण ज्याला या स्वप्नाचा अर्थच काढता येत नाही तो या स्वप्नास दुःस्वप्नच म्हणेल आणि वरीलप्रमाणे इलाज सांगून १०१ रुपये दक्षिणा, भोजन खर्च अधिक साडी चोळी बांगड्या असा कर आकारणार आणि स्वप्नाचे दुष्ट्फल नष्ट करण्याचे वचन देऊन तुम्हास तुष्ट करून स्वतः पुष्ट होणार यात वादच नाही. आता येथे या स्वप्नाचे विश्लेषण केले तर वास्तवतेत तशी घटना घडणे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे हे स्वप्न जसे पडले तसे घडले या सदरात मोडणारे नाही. वास्तवतेत काहीच घडलेले नसल्यामुळे हे स्वप्न प्रत्याघातीही नाही. म्हणून हे स्वप्न अत्यंत सूचक असून अत्यंत “शुभ” आहे हे जाणकारच जाणतात. अशी स्वप्ने पडतात हे मी स्वप्न क्रमांक ६त स्पष्ट केले आहे. असे स्वप्न मला एका डॉक्टरांनी माझी परीक्षा घेण्याकरता एका विध्यार्थ्यास विध्यार्थी दशेत पडले असल्याचे सांगितले होते. मी त्याचा अर्थ सांगून हा विद्यार्थी “डॉक्टरच” होणार असे सांगताच त्यांनी त्यांनाच विद्यार्थीदशेत असे स्वप्न पडल्याचे कबूल केले.

स्वप्ने पाडून घेण्याचा मार्ग

“स्वप्न भविष्य” या पुस्तकात सूचक स्वप्ने पाडून घेण्याचा मार्ग सांगितला आहे तो असा :-

“पहिला मार्ग म्हणजे चैतन्य विद्युत(प्राणज्योत) वाढवीत जाणे व जड विद्युत कमी करणे होय. हा मार्ग फार कष्टाचा आहे. या मार्गाने जाणारी माणसे फारशी चमत्काराच्या मागे लागत नसतात. (?) दुसरा मार्ग थोडक्यात साधणारा व क्षणभर चमत्कार दाखविणारा असा आहे.

उदाहरणार्थ :- उपवास कडकडीत केल्याने व अन्न कमी खावून झोपल्यावर सूचक स्वप्ने पडतात.”

पहिला मार्ग वाचताना चुकल्यासारखा वाटतो हे कबूल न करता तो ‘कष्टाचा’ या गोंडस शब्दाखाली दाबला गेला. राहता राहिला दुसरा मार्ग. “स्वप्ने हि माणसास स्वेच्छेने कधीच पडत नसतात.” हा निसर्गाचा अलिखित नियम मान्य केल्यावर स्वप्ने पाडून घेता येतात हे विधान बरोबर होऊच शकत नाही. सर्वसामान्य माणूस स्वानुभवाने एवढेच सांगू शकेल की, जेवण जास्त झाल्यास पडलेली स्वप्ने हि सुसंबद्ध तर नसतातच पण काही तरी लक्षात ठेवण्यासारखे असते असेही नसते. नशापाणी(दारू, गांजा वैगरे) करून झोपल्यास स्वप्न जलद चित्रपटासारखी पडतात. त्यातील दृश्यांची गती वाढलेली असते. तर कडकडीत उपास करून (किंवा घडल्यामुळे) जे स्वप्न पडेल ते नितळ स्वच्छ असेल. हे अनुभवांती खरं जरी असलं तरी यामुळे स्वप्न “सूचक”च पडेल हे संभवनीय नाही. या उलट निसर्गाला स्वप्नामार्फत सूचना द्यावयाची असल्यास तो तुम्ही वरील तीनही स्थितींपैकी कोणत्याही स्थितीत असल्यास दिल्याशिवाय राहणार नाही. मी मुंबईला दोघा मित्रांबरोबर राहत असे. एक वेळ एक जन पिऊन रात्री दोनला घरी आला. रस्त्यात पडत झडत आल्यामुळे हातपाय खरचटले होते. तोंडावर पडल्यामुळे रक्त येत होते. घरी येताच त्याला स्वच्छ करून झोपवले. अशा स्थितीतही त्याला स्वप्न पडले. त्यानी मला सकाळी स्वप्न सांगितले. मी सूचक भागाचा अर्थ सांगून ३ वर्षात उन्नती होईल असे सांगितले. आज तो मित्र क्लास वन ऑफिसर आहे. थोडक्यात म्हणजे स्वप्ने पाडून घेता येतात ही कल्पनाच चुकीची आहे. असे जर असते तर ज्यांच्या घरी चूल पेटत नाही त्यांना हवी ती स्वप्ने पाडून घेता आली असती व सर्वजण मग चुलीत घालता आले असते, पण असे होणे निसर्गास मान्य नाही.

स्वप्न्फल आणि विश्वास

बऱ्याच लोकांनी स्वप्न्फलावर विश्वास कसा ठेवावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. विश्वास ठेवणे न ठेवणे ही त्या त्या व्यक्तीच्या बौद्धिक पातळीवरील गोष्ट आहे. विज्ञानाने प्रस्थापित झालेले परिणाम यावर विश्वास ठेवा असे सांगावे लागत नाही. तसेच निसर्गाच्या नियमांवर विश्वास ठेवा असेही सांगावे लागत नाही. पिकलेल पान आणि फळ खाली पडणारच यावर विश्वास ठेवा हे सांगायची गरज नसते. याच्या प्रचाराकरिता कोणत्याही “महासंघा” ची स्थापना करण्याची आवश्यकता नाही. मनुष्य मरतो यावर विश्वास ठेवा असे “मानव कल्याण मंडळा” ला सांगत फिरावे लागत नाही. मी अगोदर मरेन आण मगच तुम्हाला सांगेन, अशा माणसास तुम्ही कोणत्या श्रेणीत टाकावे ते तुम्हीच ठरवा.

स्वप्न्फल हे निश्चित कसे झाले असा एक प्रश्न विचारण्यात येतो. स्वप्न्फल हे कोणा एका व्यक्तीने सांगितले असेही नव्हे. स्वप्नाच्या परिणामाचा शोध घेण्याचा चाळा माणसास लागल्यापासून माणसाने स्वतःस तसेच इतरांस पडलेल्या स्वप्नाचे परिणाम तपासले आणि ढोबळ मानाने स्वप्न्फल फक्त “शुभ आणि अशुभ” एवढ्यातच राहिले. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, स्वप्नात दिसलेल्या वस्तूवरून, त्याच्या संगावरून हि फले प्रस्थापित केली. मानवी मनाच्या तालाचा ठाव न घेता फक्त काही वस्तूंच्या दिसण्यावरून, तिच्या रंगावरून हे ठरवले. खोलात फक्त एकच माणूस गेला आण तो म्हणजे सिग्मंड फ्राईड.(पुढील भागात यांचा सिद्धांत थोडक्यात सांगितला आहे.)

विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा, डोळस श्रद्धा, हे सारे प्रकार म्हणजे शब्दांनी व्यर्थ पखरण आहे. मूळ ज्ञान आहे. ज्ञानाचा लोप म्हणजेच अज्ञान. दोन्ही एकत्रित राहू शकत नाहीत. अंधाराचा लोप म्हणजे उजेड आणि प्रकाशाचा लोप म्हणजे अंधार. अंधार आणि उजेड हे दोन्ही कधीही एकत्रित राहू शकत नाहीत, परंतु आम्ही शब्द भिन्न भिन्न प्रकारे वापरून मूळ स्वरूपाचे झकास वाटोळे करतो. विज्ञानात किंवा निसर्गाच्या नियमात अतिशयोक्ती अलंकार चालत नाही; इतकेच नव्हे तर यामुळे त्याच्यात फोलपणा येऊन नुसती “पोल” शिल्लक राहते. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास खालीलप्रमाणे देता येईल. योग्याभ्यासी मंडळी नेहमी एक गंमतीदार वाक्य वापरतात. ते म्हणजे “प्राणायामाने आयुष्य वाढते.” हे वाक्य वाचायला, ऐकायला मोठे गोड वाटते; पण यातील तथ्य आणि सत्य पाहिले तर हाती भोपळाच पडेल. कारण आयुष्य केव्हा संपणार हे निश्चित नाही तर ते वाढले आणि वाढते ते केव्हा आणि कोठून? उत्तर नाही. मग ठेवा विश्वास. मग असा बेंगरूळपणे विश्वास ठेवला की, श्रद्धा, शुद्ध श्रद्धा, डोळस श्रद्धा हि मालिका चित्रपटासारखी सुरु होते. या मालिकेचे पुलं.च्या भाषेत वर्णन करावयाचे ठरवले तर ते असे करता येईल.

  • पुणे हे शहर विद्वानांनी भरले आहे – विश्वास
  • विद्वान पुण्यात जन्माला येतात – अति विश्वास
  • पुण्याव्यतिरिक्त विद्वा नाही – श्रद्धा
  • मराठवाडा व विदर्भात विद्वान नाहीतच – अति श्रद्धा
  • अहो! पुण्यातील गाढवसुद्धा विद्वान की हो! – डोळस श्रद्धा

आहे का नाही अलंकार वापरून निर्माण केलेली गमंत?

मृत्युंजयाचा जप

या जपाबद्दल सांगतात की, जो कोणी याचा जप करील तो अमर होईल.(मनुष्य प्राणी मर्त्य आहे हे विसरून चाललेला हा विसरभोळेपणाचा खेळ). आता ज्यांनी हा मंत्र तयार केला तो तर केव्हाच मरून गेला, मग आम्ही “अमर” कसे होऊ? कोणी सांगितले तर आपण ऐकू एवढेच.

सत्य-सत्य-सत्य

हा एक असाच खुळखुळा आहे. लहान मुले याच्याकडे आणि त्याच्या आवाजाकडे आकर्षित होतात. खरे पाहिले तर सत्य आणि सत्याचा शोध फक्त वैज्ञानिक लावतात. इतर फक्त टाळ्या व झिंदाबादाचे धनी. साहित्यिकांनी या सत्यावर “असत्याची” इतकी पुटे चढवली आहेत की, ती खरडून काढली तरी शिल्लक राहणारच. मराठीत “खरे” आणि “सत्य” हे दोन शब्द स्वतंत्र अर्थाचे आणि ध्वनीचे असताना देखील साहित्यिकांनी याची उलटसुलट घालेमेल करून “सत्य” याचे खरोखर खोबरे करून टाकले. या बाबतीत मी एक तिखट आठवण सांगतो.

मी मुंबईला ज्या मित्राकडे राहत होतो त्याचा एक मामेभाऊ एक वेळ मुंबईस आला. मी, श्री. कांबळे व आमचा मित्र असे आम्ही तिघेजण एका जागेत राहत होतो. आमच्या मित्रास औरंगाबादला बदली पाहिजे होती, पण ती होत नव्हती. त्यामुळे तो काळजीत असायचा. त्याचे मामेभाऊ सकाळी पावणे नऊ वाजता शौच्यास जावून आले. पाय टॉवेलनी पुसत म्हणाले, “काका तुम्ही कसल्यातरी काळजीत आहात.” त्यावर माझा मित्र म्हणाला “अरे, माझी मुलंबाळ औरंगाबादला असतात. मला औरंगाबादला बदली पाहिजे पण ती काही होत नाहीये. काय करावं ते समजत नाही.” त्यावर त्यांचा मामेभाऊ म्हणाला, “मी तुला एक तोडगा सांगतो. त्यावर तु अंमल केलास तर तुझी बदली आठ दिवसांत औरंगाबादला झालीच म्हणून समज. बघ आहे का तयारी?”

असे म्हणून तो आम्हा सर्वांकडे बघू लागला. आमच्या मित्रासही आपला मामेभाऊ हा “पहोचे हुवा” आदमी वाटला आणि त्या दृष्टीने त्यांनी आमच्याकडे पहिले. आम्हाला अर्थात तोडग्याचे औत्सुक्य होतेच. माझा मित्र म्हणाला, “अरे, तू म्हणशील ते करायला मी तैय्यार आहे. बोल, काय करू?” यावर ते विद्वान मामेभाऊ म्हणाले, “तू फक्त आठ दिवस सत्य बोलायचं. खोटं बोलायचं नाही. आठ दिवसात काम झालंच म्हणून समज. नववा दिवस लागणार नाही.

आम्ही थक्क झालो. यावर त्यांनी आम्हाला विचारले, “तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का?” यावर मात्र मला मिस्किलपणा करायची लहर आली अन् मी म्हणालो, “पाहुणे, तुम्ही आठ दिवस सत्य बोलायला सांगितलं पण सत्य म्हणजे काय ते सांगितलं नाही.” त्यावर ते म्हणाले “सत्य म्हणजे सत्य. खोटं नाही ते सत्य. समजलं?” मग मी त्यांना म्हणालो, “आम्हा दोघांना म्हणजे श्री. कांबळे आणि मला पण बदली पाहिजे आहे. आम्ही आजपासून तुमच्या तोडग्याप्रमाणे बोलावयास सुतुवत केली. आम्हा दोघास जर आमच्या मित्रांनी, म्हणजे तुमच्या काकांनी, विचारले की, ‘माझा मामेभाऊ तुम्हास कसा वाटला?’ यावर श्री. कांबळे म्हणतील, ‘मला तर शहाणा वाटला.’ मी म्हणेन मला तर ‘शुद्ध मूर्ख’ वाटला. आता सांगा पाव्हणे की आमच्यापैकी ‘सत्य’ कोण बोलले? अन् काम कोणाचे होणार?” पाव्हणे परत संडासात गेले ते आम्ही ऑफिसला गेल्याची खात्री झाल्यावरच बाहेर आले.

Swapnanchi-Duniya-3

माणूस हा तसा आपआपल्यापरि श्रद्धाळू आहे. तो आपली स्वश्रद्धा हीच तेवढी खरी समजतो व इतरांची श्रद्धा हि अंधश्रद्धा असून उपहासाची समजतो. फार जुन्या काळाची एक घटना कोणातरी कीर्तनकारांनी सांगितलेली आठवते.. मुसलमानी राजवटीचा नंगा नाच चालू होता. बळी तो कानपिळी हा नियम. मुसलमान ब्राह्मणाला कधी ब्राह्मण म्हणत नसत. तर नेहमी बम्मन-बम्ण्या असे संबोधित असत. तर खवचट ब्राह्मण त्यांना हजरत-लांडे- असे संबोधित. एक वेळ एक तरुण ब्राह्मण आपल्या वडिलांचे श्राद्ध करावयास गावच्या नदीकाठी बसला. भाताचे मोठाले पिंड तयार केले. आता विधी सुरु करणार इतक्यात एक तरुण मुसलमान नदीजवळच्या आपल्या वडिलांच्या कबरीजवळ फुलं व ऊदबत्ती लावण्याकरता जात असतानाच त्या ब्राह्मणास म्हणाला, “अरे बम्ण्या, तेरा बाप यह भात खाने को कब आयेगा रे?” ब्राह्मणाचे कारटेही काही कमी नव्हते. ते म्हणाले, “अबे हजरत, क्यू परेशान होता है| तेरा बाप ऊदबत्ती और फूल की खुशबू लेणे को जब कबरमेंसे बाहेर आयेगा तब मेरा बाप भात खानेकु आयेगा. अगर नही आया तो मै यह भात तेरे बाप को खिलाउंगा.”

अशा आहेत या अंधश्रद्धा-श्रद्धा यांच्या अंधारातील गंमती आणि गंमतीदार लढाया आणि वर त्यांच्या बढाया.


5 Comments

डॉ. सिगमंड फ्राईड – स्वप्नमीमांसा

पहिल्या भागात स्वप्नाबद्दल असणाऱ्या भ्रामक कल्पना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्न्शास्त्राकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित असू नये. शक्यतो तर्कशास्त्राच्या तसेच मानसशास्त्राच्या आधारे दोन्ही शास्त्रांच्या मर्यादा न ओलांडता हा प्रयत्न केला आहे.

स्वप्नावरील पुस्तक लिहित असताना डॉ. सिगमंड फ्राईडचा उलेख न करणे निश्चितच कृतघ्नता ठरेल. म्हणून डॉ. सिगमंड फ्राईड यांचा अल्प परिचय देऊन त्यांचा थोडक्यात सिद्धांत आणि स्वप्नाबाबतची मते जी त्यांनी “मनोविश्लेषण” पद्धतीने मांडली आहेत ती देऊन त्यांचा परामर्ष या भागात घेण्याचे ठरवले आहे.

डॉ. सिगमंड फ्राईड – अल्प परिचय

“स्वप्न-योग अथवा स्वप्नाचा अर्थ” या छोटेखानी पुस्तकात स्वामी शिवतत्त्वानंद यांनी डॉ. सिगमंड फ्राईडचा अल्प परिचय आणि सिद्धांत अगदी थोडक्यात देऊन भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांच्या सिद्धांताचा परामर्ष घेतला आहे. त्यातूनच आवश्यक तेवढी माहिती येथे देत आहे.

इसवी सन १७५६ साली झेकोस्लोव्हाकियात ज्यू आईबापांच्या पोटी सिगमंड फ्राईड यांचा जन्म झाला. फ्राईड हे व्यवसायाने डॉक्टर होते. आपल्या धंद्यातील औषधाच्या मिश्रणापेक्षा स्वतःच्या धंद्याच्या शास्त्रीय बाजूकडेच त्यांचे अधिक लक्ष व रुची होती. रोग्याशी प्रत्यक्ष संबंध आणि स्वतःची शास्त्रीय प्रतिभा ह्यांच्याद्वारे डॉ. सिगमंड फ्राईड यांना मानवासंबंधी विलक्षण साक्षातकार झाला. त्यांना मानवाचे एक आगळेच दर्शन घडले. त्यांना असे आढळून आले की, माणसाला होणाऱ्या रोगांपैकी कितीतरी रोग असे असतात की ते दिसतात शारीरिक, पण त्यांचे कारण असते मात्र मनात. उदाहरणार्थ, रोग्याला झाला आहे अर्धांगवायू; परंतु डॉक्टरी परीक्षेत दिसून आले की बिघाड शरीरात वा इंद्रियात नसून त्यांच्या क्रियेत(Functional) आहे. बह्यादृष्ट्या अर्धांगवायूची लक्षणे आहेत, पण ज्या भागात ती लक्षणे दिसत आहेत तो भाग डॉक्टरीदृष्ट्या अगदी निकोप आहे. त्यांना होता होता असेही आढळून आले की रोग्याचे शरीर निकोप असले तरी मन निकोप नाही. काही विशिष्ट वासना, काही अत्यंत प्रबळ इच्छा, काही कारणांनी दाबून-दडपून टाकाव्या लागल्यामुळे ज्ञानतंतुवर ताण पडून त्या रोग्याच्या शरीरात या विशिष्ट रोग्याची बाह्य लक्षणे दिसत आहेत. त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक गोष्ट हि की, आपल्या विशिष्ट मानसशास्त्रीय प्रक्रियेने त्या रोग्याच्या त्या दबलेल्या किंवा दाबलेल्या वासना-इच्छा ‘मोकळ्या’ करताच औषधाशिवाय त्यांचा रोग बरा झाला. याचा त्यांना वारंवार अनुभव येत गेला. आणि त्यांनी आपले लक्ष रोग्याच्या “मना” कडे वळविले. ते शरीरशास्त्राचे मानसशास्त्रज्ञ बनले.

डॉ. सिगमंड फ्राईड यांचा सिद्धांत

प्रतिभाशाली डॉ. सिगमंड फ्राईड हे मानवी मनाचे दोन भाग मानतात. त्यातील एका भागाने आपण जगाशी व्यवहार करीत असतो. परंतु आपल्या मनाचा बराच मोठा भाग या आपल्या दैनंदिन व्यवहारात प्रत्यक्षपणे भाग घेत नसतो. इतकेच नव्हे तर आपल्या मनाच्या अंधाऱ्या भागात काय काय दडलेले आहे किंवा दडविलेले आहे याची आपल्याला जाणीवही नसते. पहिल्या भागाला फ्राईडनी नाव दिले ‘जाणीव युक्त मन’ (Conscious Mind) आणि दुसऱ्याला नाव दिले ‘नेणीवयुक्त मन’ (Unconscious Mind). डॉ. सिगमंड फ्राईड यांना असे आढळून आले की स्वतःच दडवून ठेवलेल्या स्वतःच्याच ज्या वासनांची रोग्यांना जाणीव नसते, त्या वासना-इच्छा या ‘नेणीवयुक्त’ मनात डांबल्या गेलेल्या असतात. वासना किंवा इच्छारुपी या प्रबळ प्रेरणांच्या अंगी प्रचंड शक्ती असते. ही शक्ती अशा जबरदस्तीने डांबली गेल्यामुळे ती ज्ञानतंतुंवर दाब आणून शारीरिक विकृती वा रोग औषधाशिवाय आपोआपच बरा होतो. मानवी मनाच्या क्रिया-प्रक्रियांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला “मानसशास्त्र”(Psychology) म्हणतात. मनाच्या या क्रिया-प्रक्रियांच्या पलीकडे जाऊन, मनाचे विश्लेषण(Analysis) करून त्या बाह्य क्रिया-प्रक्रियां आतील हेतू, प्रवृत्ती वैगरेंचे अनुशीलन करीत असल्यामुळे फ्राईडच्या मनोविद्येला “मनोविश्लेषण”(Psycho-Analysis) म्हणतात. मानवी मनाचा तळ फ्राईडपूर्वी कोणीही गाठण्याचा प्रयत्न केला नाही. उलट “मन हे चंचल मोठं बर! या चंचल मनाचा थांग कोणालाही लागलेला नाही. महाराजा, सागराच्या तळाशी कधीतरी मनुष्य जाऊ शकतो का? त्यापेक्षाही कैकपटींनी मनाचा तळ आहे महाराजा” अशी हरदासी संगीतमय थाप मारून सुसंबद्ध पळवाट काढून प्रयत्नातून काढता पाय आपण घेतला. फ्राईडच्या पूर्वी कोणाही माणसाने “जाणीवयुक्त” मनाचा भेद करून “नेणीव”त शिरून मनाचा तळ गाठण्यात प्रयत्न करून यश मिळविले नाही. या यशस्वी संशोधनामुळे मानसशास्त्रात पडलेली भर निःसंशय प्रशंसनीय म्हणावी लागेल.

Swapnanchi-Duniya-4

फ्राईडचे ‘काल’चे अर्धसत्य. माझे ‘उद्या’चे अर्धसत्य. दोन्ही मिळून एक पूर्ण सत्य.

रोग्याचे असे मनोविश्लेषण करताना डॉक्टर सिगमंड फ्राईड यांना असे आढळून आले की नाना कारणांनी रोगी आपल्या ज्या वासना किंवा इच्छा दाबून टाकीत असतो त्या वासना-इच्छा या प्रामुख्याने लैंगिक वा कामुक स्वरूपाचा असतात. त्या वासना मनात बाळगणे व तदनुसार वागणे धार्मिक विधीनिषेधामुळे, नीती-अनीतीच्या कल्पनांमुळे, सामाजिक बंधनामुळे, लोक काय म्हणतील या लाजेमुळे वा भयामुळे अशक्य झाल्यामुळे माणूस त्या दाबून टाकतो. इथपर्यंत डॉ. फ्राईडचे म्हणणे बरेचसे समाधानकारक आणि सयुक्तिक वाटते. या बाबतीत त्यांच्या व्यावसायी बंधूचे पण दुमत नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.

सिद्धांताचा अतिरेक

डॉ. फ्राईड हे धंद्याने डॉक्टर होते. त्यांचा रोग्याशी संबंध येणारच. या रोग्यात विकृत रोग्यांचा भरणा जास्त होता. अशांचे मनोविश्लेषण करून त्यांनी एक सिद्धांत बांधला की “काम” हीच मानवी जीवनातील एकमेव प्रेरणा असून ती नीट व्यक्त आणि तृप्त होणे यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. याकरिता “नव्या नीती”ची स्थापना केली पाहिजे. या नीतीचे एकमेव ध्येय राहिलं मानवाची कामवासना “नीट” व्यक्त, संचालित आणि तृप्त करणे.

डॉ. सिगमंड फ्राईडचे परम मित्र श्री.अड्लर आणि युंग आणि इतर चाहते यांचे या मताबद्दल तीव्र मतभेद झाले आणि त्यांनी डॉक्टरांना सोडून दिले. डॉ. फ्राईडच्या मते माणूस हा एक कामवासनेचे भेंदाळे आहे, याशिवाय अधिक काही नाही. हे मत देखील मनोवैज्ञानिकात मतभेद निर्माण करूनच गेले. अशा रीतीने या “काम” रत्नांनी फ्राईडला झपाटून टाकले. मुळचा कामप्रवूत्ती अत्यंत प्रबळ असलेला फ्राईड वरील स्वतःच्याच विचाराचा एक “रोगी” बनला. कावीळ झालेल्याला जसे “पिवळे” दिसते आणि त्याचे डोळेही पिवळेच होऊ लागतात त्याप्रमाणे डॉक्टरांना “कामकावीळ” झाली. परिणाम असा झाला, मनाचा तोल गेलेले विकृत रोगी आणि त्यांची स्वप्ने आणि तोल न गेलेल्या माणसांची स्वप्ने ही “कामकावीळ” या सदरातच त्यांनी टाकली.

मनोवैज्ञानिकांनी डॉक्टरांचा सिद्धांत अर्धवट आणि घातकी ठरवला आहे. हा विषय मनोवैज्ञानिकांचा असल्यामुळे त्यांच्यावरच सोपवून देऊ आणि डॉक्टरांच्या स्वप्नावरील मतांचा परामर्ष घेऊ.

सिगमंड फ्राईड आणि स्वप्ने

माणसाला स्वप्ने पडू लागली तेव्हापासून माणूस त्याचा अर्थ काय? ती का पडतात? त्यात काही आहे का? यावर विचार करू लागला. नव्हे तर तो एक त्याचा चाळाच झाला. मुठभर माणसं सोडली तर जगात स्वप्न पडत नाहीत अशी माणसं मिळणे दुर्मिळ. बहुतेकांना मान्य असलेला अर्थ म्हणजे ‘स्वप्ने ही भविष्य दर्शवितात,’ हा होय. पण डॉ. सिगमंड फ्राईडच्या मते “स्वप्ने ही वस्तुतः भूतसुचक अथवा गतकाळाची निदर्शक असतात. त्यात भविष्य असं नसतंच. स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे वेषांतर.”

डॉ. फ्राईड स्वप्नाकडे कसे वळले हे पाहणे आवश्यक आहे. रोग्याच्या कोंडल्या गेलेल्या वासना-शक्तीला मुक्त करून क्षीण केल्यास इतर कोणतेही उपाय न करता रोग कायमचे नाहीसे होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून देऊन वैद्यकीय क्षेत्रात एक अभूतपूर्व किमया करून दाखवली. परंतु आता त्यांना प्रश्न पडला की प्रत्येक वेळी रोग्याच्या “नेणीवे”त रोग्याने काय दडवले हे कसे ओळखायचे? तेथपर्यंत पोहोचायचे कसे? याकरिता त्यांनी रोग्यांना “विश्वासात घेऊन” चुचकारून पहिले, प्रसंगी “संमोहन” विद्येचा वापरही करून पाहिला. तरीही रोगी दाद देईना. मग याच्यावर उपाय काय? काय करायला हवे म्हणजे रोग्याच्या भावना मोकळ्या होऊन त्याचे स्वप्न कळेल? या विचारांनी डॉक्टरांना खूप डोके शिणवावे लागले.

त्यांना वरील गोष्टीकरता हवी होती एक अशी अवस्था की ज्यावेळी रोगी बेसावध राहील पण बेशुद्ध राहणार नाही. ज्यावेळी अगदी “मनातले” बाहेर पडलेले असेल, पण ते कुणाला सांगताना त्याला तितकीशी लाज वाटणार नाही. खूप विचार करता करता या भाग्यवंताला याची किल्लीच सापडली आणि आयुष्यात फक्त एकदाच उगवत असणाऱ्या “अंतर्दृष्टीचा क्षण” त्यांच्या जीवनात तरळला. त्यांना त्यांच्या विलक्षण प्रतिभेने साथ दिली आणि साद ऐकू आली “अरे वेड्या, ती अवस्था म्हणजे स्वप्न. फक्त स्वप्न या अवस्थेत मनुष्य बेसावध असतो. पण बेशुद्ध नसतो. त्या वेळी त्याच्या ‘मनातले’, त्याच्या ‘नेणीवे’तले बाहेर येत असते. जागे झाल्यावर त्याला दुसऱ्याला स्वप्न सांगताना कानकोंडे वाटत नाही. याचे कारण असे की स्वप्नात केलेल्याला, भोग्लेल्याला आपण जबाबदार नसतो अशी त्याची भावना असते. स्वप्नात व्यक्ति आपल्या स्वेच्छेने कधीही काहीही करू शकत नाही हे एक त्या मागील सत्य होय.”

आता डॉक्टरांनी विकृत रोग्यास लावलेला, “मनोविश्लेषणा”चा नियम आणि पद्धती त्यांच्या स्वप्नासही लावल्या. स्वप्नाबद्दल त्यांचे ठाम मत असे की, “स्वप्न म्हणजे दाबलेल्या वासनांचे वेषांतर”. हे सिद्ध करीत असताना त्यांनी एक पद्धत अवलंबिली, ती अशी – रोग्यांनी त्यांना स्वतःचे स्वप्न सांगायचे आणि त्यांनी स्वप्नातील घटना व वस्तू यावरून नेविणेत दबलेली कोणती वासना त्या स्वप्नात व्यक्त होत आहे हे आपल्या प्रयोगानी व अनुभवांनी बसवलेल्या ठोकताळ्यावरून अज्मावयाचे. थोडक्यात म्हणजे त्या स्वनातील वस्तूंच्या आणि घटनांच्या वेशात किंवा स्वप्नातील त्या वस्तूंच्या व घटनांच्या “प्रतिकाच्या” रूपाने त्या रोग्याची दबलेली “कोणती” वासना व्यक्त झाले हे ओळखायचे. या पद्धतीसच “स्वप्नाचा अर्थ लावणे” असे संबोधले गेले. पुढे त्यांनी ठामपणे एक अर्धसत्य सांगितले ते असे. स्वप्ने ही “पुढे काय घडणार आहे” हे दाखवीत नसून त्या रोग्याची कोणती प्रबळ वासना त्याच्या नेणीवेत दाबली गेली आहे, म्हणजेच त्याच्या “गत जीवनात काय घडले आहे” हे दाखवतात, म्हणजेच स्वप्ने माणसाचे भावी जीवन सुचवीत नसून त्याचे गत जीवन दर्शवितात. (लेखक या मताशी सहमत नाही. हे एक अर्धसत्य असून हे विधान पूर्वग्रहदुषित आहे हे पुढे सिद्ध करणार आहेच. म्हणून स्वप्नाच्या प्रतीकांची मीमांसा खाली केली आहे.)

नियतीनी या भाग्यवान माणसावर फार मोठी कृपा केली होती. इ. स. १९०० पर्यंत पृथ्वीतलावरील कोणाही माणसास जाणीवेचा आणि नेणिवेचा भेद करता आला नाही. ते भाग्य डॉक्टरांच्या वाट्याला आले. मनोविश्लेषण पध्दती निर्माण करून त्यांनी निःसंशय मानवावर अनंत उपकार केले. आपल्या या मनोविश्लेषणाच्या अद्भुत किल्लीने डॉक्टरांनी नेणिवेच्या अगम्य, गूढ, रहस्यमय अंधारकोठड्या लीलेने उघडून, त्यात कोंडल्या गेलेल्या सळसळत्या, गरगरत्या, उसळत्या वासनाशक्तींना मोकळे करून कितीतरी असाध्य रोग्यांना कायमचे रोगमुक्त करून मानवजातीच्या कृतज्ञ आशीर्वादांची जोड केली. जगात एक खळबळ माजली. वैद्यकात नवीन पायंडा पडला. मनोविद्येत नवा मनू सुरु झाला आणि आधुनिक जगाच्या जीवन्स्त्रोताने एक नवीन वळण घेतले.

नियतीनी प्रसन्न होऊन डॉक्टरांना एका दुसऱ्या प्रचंड रत्नभांडाराचे दार उघडून दिले. आत शिरताना नियतीने सुचना दिली, ”डॉक्टर,या रत्नभांडारातून तुम्ही कोणतेही एक रत्न घेऊ शकता. परत दुसरे रत्न मिळणार नाही. दालन कायमचे बंद राहील.” डॉक्टरांनी या दालनात प्रवेश केला. असंख्य रत्ने पाहून डॉक्टर हबकून गेले. त्यांना आपल्या मूळच्या कामुक प्रवृत्तीवर मात करता आली आणि त्यांनी एक रत्न घेतले. ते होते फक्त “काम” रत्न.

एखाद्या भिकाऱ्यास त्याच्या गोड गळ्यावर प्रसन्न होऊन राजानी आपल्या सुवर्ण भांडारात त्याला नेऊन म्हणावे, ”मी तुझ्या गोड गळ्यावर प्रसन्न झालो आहे. घे, यातील हवी ती सुवर्णाची वस्तू घे.” त्या मूळच्या भिकाऱ्यानी फक्त एक सोन्याची कटोरी उचलली आणि तो राजाला म्हणाला, “आता ही कटोरी घेऊन मी भिक्षा मागेन.” तसाच प्रकार डॉक्टर फ्राईड यांच्या बाबतीत घडला.

आपल्याकडे अतिकामुक वृत्तीची माणसे होऊन गेलीत. पण क्षणिक कामकुतेचा प्रत्यय येताच त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. संत तुलसीदास संत होण्यापूर्वी अतिकामुक होते. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या डोळ्यापुढे चोवीस तास असलेली कामवासनेची वखवख माणसाच्या क्षणिकतेचे चित्र पुढे करून त्यांना जंताचा संत केला. जोवरी मांस तोवर वास. नंतर राहतील ती फक्त हाडे अन् ती चघळावी लागतील कुत्र्या सारखी. माणसासारखा माणूस असून तुला व्हावे लागेल फक्त कुत्रे, अन् तेही पिसाळलेले.

तुलसीदास जीवन बदलू शकले पण सिगमंड फ्राईड आपले जीवन बदलू शकले नाही. एक झुंझार चिवट ज्यू, अडीअडचणींना भीक न घालता एक प्रचंड कार्य करू शकला. पण स्वतःच्याच वासनेच्या प्रवाहात वाहत गेला. जीवनाचा काळाकुट्ट भाग अधिक काळाकुट्ट झाला. त्याचे द्योतक आहेत त्याची प्रस्थापित “प्रतिके”.

स्वप्नात येणाऱ्या वस्तू आणि दृश्ये याचा अर्थ सांगण्याचा मान प्रथम इजीप्शियानांना जातो. नंतर जसाजसा प्रचार होत गेला तसे यास प्रत्येक भाषेत स्थान मिळत गेले. स्वप्नाची फळे ही एका व्यक्तीची नव्हेत. पण ज्यांना ज्यांना सारख्या वस्तू आणि दृश्ये दिसत गेली आणि त्यांचे परिणाम ढोबळ मानाने सारखे दिसू लागले, त्या त्या वेळी त्या वस्तू – द्रव्य – त्या परिणामाची प्रतीके ठरली. यात विशेष गंमत दिसेल ती ही की सर्व शुभ स्वप्नांची प्रतीके सारखीच आहेत. तशीच अशुभाची अर्थात ढोबळ मानानी. उदाहरणार्थ, पांढऱ्या रंगाची वस्तू दिसणे ही सर्व धर्मात शुभच मानली आहे. पुढे पुढे मनन, चिंतन आणि अनुभव या आधारावर यास फाटे फुटले आणि वस्तू त्याच रंगाची असून देखील शुभ न ठरत अशुभ ठरू लागली. याचे उदाहरण म्हणजे पांढरा भात, पांढरी राखाडी आणि गोरा ब्राह्मण (भिक्षुक, पुरोहित या अर्थी) ही अशुभ ठरली. तर काळ्या रंगाची वस्तू असूनही ती शुभ ठरली ती काळी गाय, काला ब्राह्मण इत्यादी. मी एका स्वप्नात हे दिले आहे.

आता डॉ. फ्राईड यांच्या प्रतीकांकडे बघू. काडी, चाकू, सुरा, दौत, टाक, भुसभुशीत जमीन, गुहा, नारळ, पपई, गोल गोल आकाराची फळे (मग ती कोणत्याही रंगाची असोत) हरळी आणि ध्वज – यादी मोठी होईल म्हणून ही थोडी प्रतीके, भाताची शितावरून परीक्षा देण्यास पुरेशी आहेत.

जगाच्या कोणत्याही भाषेतील पुस्तकात या वस्तूंचा अर्थ त्या वस्तूच आहे असा घेतला जातो. स्वप्नफलाकरता या वस्तू सूचक या सदरात मोडणाऱ्या पण नाहीत. पण ज्या आहेत त्यांचे फळ निश्चित ढोबळ मानानी ठरले आहे. उदाहरणार्थ, नारळ, यास श्रीफळ म्हणून संबोधण्यात येते व ते “शुभ” या सदरात मोडते. ध्वजाच्या बाबतीत ध्वजाचा रंग विचारात घ्यावा लागतो. काठी नव्हे. कारण ध्वज हा काठीशिवाय उभाच राहू शकत नाही.

आता सिगमंड फ्राईडनी या वस्तूंकडे आपल्या विकारी दृष्टीतून बघितले आणि ही प्रतीके म्हणजे स्त्री पुरुषांच्या दडपलेल्या वासनाच होत, त्या फक्त वेषांतर करून आल्या इतकेच, असे ठासून सांगितले. त्यांनी काठी, चाकू, सुरा, टाक ही पुरुष जननेंद्रिये मानली, तर दौत, गुहा, भुसभुशीत जमीन ही स्त्री जननेंद्रिय मानली. नारळ, गोल मोठाली फळ आणि हरळी हि कसची प्रतीके असावीत हे सुज्ञ वाचकास सांगण्याची गरज नाही. अशा रीतीने फ्राईडने आपल्या मनातील घाण या प्रतीकांवर फेकून स्वतःचीच एक सुप्त “कामेच्छा” तृप्त करून घेतली असे म्हणावयास हरकत नाही. आता या प्रतीकांकडे नजर टाकली तर आपणास असे आढळून येईल की ज्या वस्तूच्या गुणधर्माचे साम्य स्त्री-पुरुषाच्या जननेंद्रियाशी काही अंशी मिळते जुळते आहे, केवळ काही अंशी साधर्म्य असल्यामुळे त्या वस्तू “त्याचीच” प्रतीके होऊ शकतात, दुसरी प्रतीके होऊच शकत नाही. असे होऊ शकते का? याचे उत्तर नाही. स्त्रीपुरुषाच्या जननेंद्रियाशी साम्य नसलेल्या वस्तू स्वप्नात येउच शकत नाहीत काय? उत्तर नाही. काठी हे पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतीक असेल तर पुरुषाचे जननेंद्रिय हे कसचे प्रतीक आहे? उत्तर नाही. विष्ठा, घाणेरडी टोपी, महारोगी, गाय, वाघ, कावळा ही काय दडलेल्या लैंगिक भावनांची-वासनांची प्रतीके होऊ शकतात? उत्तर नाही. वरील वस्तूंचे स्त्री-पुरुषाच्या जननेंद्रियाशी कोणतेही साम्य नाही. तरी ती प्रतीके आहेत. फ्राईड सोडून इतर यांस मान्यता देतातच.

लैंगिक भावना-वासना – या भुतांनी या डॉक्टरला भोगाचा रोगी बनवला. जसा रोगी तसा डॉक्टर. दोघांच्याही ध्यानी मनी लैंगिक भावना. या भावनेनी व भूतकाळातील भुतांनी डॉक्टरांना “भविष्य काळात” उडी मारू दिली नाही.

डॉ. फ्राईडनी तसं पाहिलं तर “स्वप्नात भविष्य नसतं” हे विधान करून निसर्गाचा अपमानच केला आहे. निसर्गाइतकी विलक्षण समता कोठेही सापडणार नाही. त्यातल्या साम्तेत केसाचाही फरक पडत नाही. अगदी उदाहरण देऊनच सांगावयाचे झाले तर डाव्या डोळ्याच्या पापणीला जेवढे केस असतात तेवढेच उजव्या डोळ्याच्या पापणीला सापडतील. जो निसर्ग काल पडलेल्या स्वप्नात कालच्या काळ स्मृतीकक्षेच्या बाहेर गेलेल्या गोष्टी वेषांतरित स्वरुपात दाखवू शकतो, त्या निसर्गास भविष्यकाळात घडणाऱ्या घटना अगदी लीलया दाखवता येतातच. अर्थात दोन्हीतही वेषांतर आहेच.

खरा नाट्य रसिक जसा पात्रास बघून कोणता हा नात आहे हे जसे अचूक ओळखतो, तसेच स्वप्नातल्या वस्तू-दृश्य ही कोणत्या घटनेची “सूचक” पात्रे आहेत हे जाणकार ओळखतात. आणि अशांचीच ती प्रतीके भविष्य दर्शवितात असे निश्चित सांगितले आहे.

फ्राईड स्वप्नात भूतकाळात दडलेल्या लैंगिक वासनाची भुते असतातच असे नव्हे तर त्यात भविष्यात घडणाऱ्या घटना सांगणारे दूत पण असतात. हे लक्षात न घेता आपण हे दालन आपल्या हातानी कायमचे बंद करून घेतले. ज्या निसर्गाने-नियतीने- आपणावर प्रसन्न होऊन एवढी दिव्य प्रतिभा आपणास मुक्त हस्ते अर्पण केली त्या निसर्गाला आपण अर्धवट ठरून मोकळे झालात. काही काळ जग भारले गेले. सत्य-सत्य म्हणून ओरडले पण शेवटी नियतीने या पक्षपातीपणाचा सूड उगवला. आपणास पश्चातापदग्ध व्हावे लागले आणि प्रांजळपणे आपण कबूल केले ते असे.

“जगातले अशक्य” ते तीन आहेत. पहिले अशक्य म्हणजे “सुरळीत राज्यकारभार”. तो कधीच, कुणाकडूनही अशक्य. दुसरे अशक्य म्हणजे मुले “नीट” वाढवणे हेही कधी शक्य नाही. आजकाल जाणवू लागलेले तिसरे अशक्य म्हणजे “मनोविश्लेषणाने” रोग बरा करणे. एवढ्या पोलादी पुरुषाला आपल्या मनोविश्लेषणाबद्दल एवढा पराभव स्वीकारावा लागला तेथे त्यास स्वप्नाच्या अर्थाबद्दल बोलावयास शब्दच सापडले नाहीत यात नवल ते कसले.

फ्राईडच्या “प्रतीका”ची आपण लावलेली वाट बघितलीच आहेच. आता त्याचे “वेषांतर” बघू. स्वप्नात वेष बदलून येतात असे तो म्हणतो व तेही भूतकाळातील. भविष्यकाळ त्याने अंधारातच ठेवला. साधी गोष्ट तो विसरला की “उद्या” हाच परवा “काल” होतो. एक गमतीदार घटना देऊन स्वप्नात वेषांतर करून “दूत”ही येऊ शकतात हे दाखवतो.

मी मुंबईला असताना आमच्या एका परम मित्राबरोबर दार रविवारी रेसला जात असे. मला त्यातले काही कळत नाही. पण वेळ जात असे आणि एक आगळी धावपळ पाहण्यात मजा यायची. मी कधीही जॅकपॉटचे तिकीट काढले नाही. ५-२५ रुपयापर्यंत मजल. आत एका बाकावर बसून सिगरेट पित असे. मी उभे राहून आणि चालताना कधीही सिगरेट पित नाही. आरामात बसूनच सिगरेट पितो. आमचा मित्र धावपळीत असे. एक वेळ मी असाच आरामात सिगरेट पित होतो. चार रेसेस होऊन गेल्या होत्या. इतक्यात एक लिपिक (रेव्हेन्यू खात्यातला) मजजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्ही इकडे कसे?” मी म्हणालो, “येत असतो अधून मधून – पण आपण?” त्यावर तो म्हणाला, “साहेब आपल्याला काळ स्वप्ना पडला(घाटीवर गुजराती परिणाम) त्याचा काय झाला. काल माझ्या स्वप्नात मी माझे मित्र दीक्षित यांच्या घराची चौकशी एका चाळीत करू लागलो. तोच एकजण येऊन म्हणाला, “कोण पाहिजे तुम्हाला?” त्यावर मी म्हणाला, “आमच्या ऑफिसचे हेडक्लार्क दीक्षित पाहिजेत.” त्यावर तो म्हणाला, ‘मी त्यांच्या घराशेजारीच राहतो. तुम्ही सरळ जा. घर नंबर आहे ३२५. लक्षात राहील ना?’ असं म्हणून तो निघून गेला. मला जाग आली. आज रविवार. या स्वप्नाचा मी अर्थ काढला. तनाला(TANALA) रेस मध्ये या क्रमांकाचे घोडे येणार. म्हणून आलो फक्त रु. २०/- घरी निघाले. मी एकच तिकीट काढलं आहे.” मी त्याला सिगरेट ऑफर केली. थोडा संकोचला. पण मी म्हणालो, “अरे घे, हे रेसकोर्स आहे, ऑफिस नाही.”

थोड्या वेळात रेस सुरु झाली. घोडे विनिंग पोलच्या पुढे गेले. कॉमेंट्री चालू होती. पहिली जगह के लिये तिसरा, दुसरी के लिये दुसरा और तिसरी जगह के लिये पाचवा और चौथी के लिये चौथा. लिपिक जागचा उडाला. आपलं तिकीट लागलं याचा त्याला आनंद झाला आणि निकालाकरता “फोटो फिनिश”ची वाट पहा असे अनाउन्स होताच त्याचा चेहरा पडला. आता फोटो फिनिशचा निकाल. तीन मिनिटांनी फोटो फिनिशचा निकाल जाहीर झाला आणि ३,२,५ ह्याच क्रमांकाचे घोडे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. परत त्याचा चेहरा फुलला. परंतु नंतर दोनच मिनटात “आक्षेप” घेण्यात आला आणि लाल झेंडी दाखवण्यात आली. परत त्याचा चेहरा पडला. आता जजेसच्या निकालाकडे लक्ष. सात मिनिटांनी जजेसनी “आक्षेप फेटाळण्यात येतो” एवढा निर्णय देण्यात येऊन विजयी घोड्याचे क्रमांक ३,२,५ हे जाहीर केले. आता पांढरी झेंडी दाखवण्यात आली आणि आता तो लिपिक अत्यंत खुशीत येऊन म्हणाला, “साहेब, आता सिगरेट काढा. वैताग आला होता साला. पण नशिबानी साथ दिली. १००-२०० मिळतीलच.” भाव निघण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो. १० मिनिटांनी भाव फुटला. एक तिकीट रु. चौदा हजार. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद लिहिता येणार नाही.

आता पहा. या गृहस्थांनी फ्राईड वाचला नव्हता, न स्वप्नावरील पुस्तक, न याचा मानसशास्त्राचा अभ्यास. तरीही त्यांनी घर क्रमांक हाच वेषांतर करून दिलेला संदेश मानला. (ज्ञान नसताना).

फ्राईडच्या सिद्धांतानुसार या स्वप्नात वेषांतरित भूत नाही तर आहे फक्त वेषांतरित दूत.

बाह्य कारणांनी पडलेली स्वप्ने

डॉ. फ्राईडची स्वप्ने बाह्य कारणांनी बदलू शकतात हे सिद्ध करण्याकरिता भिन्नभिन्न प्रयोग केले. त्यात त्यांनी एका प्रयोगात लहान लहान मुलांना अलग अलग छोटेखानी खोल्यात झोपवले. सर्वांना एकच आहार देण्यात आला होता. मुलांना गाढ झोप लागताच बऱ्याच वेळानंतर डॉक्टरांनी मुलांच्या डोळ्यावर भिन्न भिन्न रंगाचे प्रकाशझोत टाकले. एका मुळच्या पाठीत त्यांनी सुई टोचली होती. या सगळ्यांच्या नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या. सकाळी सर्वजण जागे झाले. त्यांनी सर्वांना पडलेली स्वप्ने विचारली. ती त्यांनी तपासली आणि त्यांना फार आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. निळ्या रंगाचा झोत ज्याच्या डोक्यावर टाकला होता त्याला आपण निळ्या आकाशात तरंगत असल्याचे स्वप्न पडले. तशीच गत इतरांच्या रंगांची झाली. ज्याच्या पाठीत सुई टोचली होती त्याला त्याच्या पाठीत राक्षस भाला खुपसत असल्याचे स्वप्न पडले. नंतर या गोष्टी अन्य प्रयोगांनी सिद्ध झाल्या. त्यांच्याच एका समव्यावसायिकांनी असेच गमतीदार उदाहरण दिले आहे. सकाळी सकाळीच एका माणसास आपले खूप स्वागत होत आहे व लोक टाळ्यांचा कडकडात करताहेत असे स्वप्न पडले. थोड्याच वेळात त्याला जाग आली. तो बघतो तर नोकर गादी काठीने बडवून धूळ साफ करत होता. काठीच्या बडवण्याच्या आवाजाचे रुपांतर स्वप्नात टाळ्यात आले हे त्यांनी सिद्ध केले.

शारीरिक गरजेमुळे पडलेले स्वप्न :-

जसे बाह्य कारणांनी स्वप्ने बदलू शकतात त्याप्रमाणे शरीराच्या गरजेनुसार देखील स्वप्ने बदलू पण शकतात. हेही त्यांनी सिद्ध केले आहे. त्यातील एक उदाहरण :-

एका माणसास खूप तळलेले पदार्थ खाऊ घातले. (प्रामुख्यानी आपल्याकडील भजी-वडे-पापड आणि इतर बेसनाचे पदार्थ. मांसाहारी असल्यास मसाला भरलेली मासळी व इतर पदार्थ) त्या माणसास नियमित चार ग्लास पाणी पिण्याची सवय आहे. अर्थात जेवण झाल्यावर. अशा माणसास वरील खमंग पदार्थाचे जेवण दिल्यावर एकच ग्लास पाण्याचा दिला आणि त्याला झोपायला लावले. त्याला स्वप्न पडत गेले. सुंदर बगीच्यात तो फिरतो आहे. सुंदर फुलं आहेत. तशीच पलीकडे सुंदर सुंदर घरं आहेत. गावातून वर देवळाकडे जाण्याचा रस्ता आहे. तो देवळात जाऊ इच्छितो. थोड्या वेळानी जाऊ, तोपर्यंत गावात फेरफटका मारून येऊ म्हणून तो गावाकडे वळतो. वळणावरच एक सुंदर हॉटेल दिसतं. तो आत जाऊन खुर्चीवर बसतो. आता त्याला खूप तहान लागलेली असते. शरीराला पाण्याची फार गरज होती. पण पाण्याकरता त्याला उठवणार कोण? इतक्यात वेटर टेबलावर पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवतो आणि ‘क्या लावू साब’ म्हणून विचारतो.

Swapnanchi-Duniya-5

‘तूर्तास पाणी पिऊ दे नंतर सांगतो’ म्हणून तो पाण्याचा ग्लास हातात घेऊन ओठाला लावतो आणि इतक्यात त्याला जाग येते. घसा पाण्याविना कोरडा झाल्याचे जाणवते. तो उठून मठातील पाणी ढसढसा पितो आणि परत झोपतो.

येथे फ्राईडनी निश्चितपणे शारीरिक गरजेमुळे स्वप्नात बदल झाल्याचे सिद्ध केले आहे. सर्वसामान्य माणसास असे भिन्नभिन्न स्वरूपाचे अनुभव येतातच तेव्हा हे सत्य नाकारता येत नाही.

काही काही व्यक्तींना उद्या काय घडणार किंवा पुढं काय घडणार याचे स्पष्ट चित्रच स्वप्नात दिसते. जसे दिसते तसे घटतेही पण अशी स्पष्ट चित्रं पाहणारी माणसं फार थोडीच. प्रामुख्यानी निसर्ग प्रतीकाच्या स्वरूपातच पुढील घटनांची स्पष्ट रूपरेखा दाखवतो. कित्येक वेळा याच्या उलटही घडू शकते. म्हणजे काय घडून चुकले याचेही स्पष्ट चित्र स्वप्नात दिसते. असं मात्र बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडतं. स्पष्ट चित्र जरी नाही आलं तरी काही प्रतिकात घडलेल्या घटनांचे रुपांतर दिसू शकते. (मनोविश्लेषणात याचा समावेश होतो) पण काही वेळा चमत्कारिक घटना घडल्याचे आढळते. यात गंमत अशी की, स्वप्न पडलेल्या व्यक्तीचा त्या घटनेशी, त्यातील द्रव्याशी किंवा व्यक्तींशी कधीही संबंध आलेला नसताना देखील घडलेल्या घटना हुबेहूब त्यास दिसतात.

या बाबतीत एक स्वप्न कै. ज. ना. ढगे यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे स्मरते. ४५ वर्षापूर्वीचा तो लेख असावा. नाव गाव आठवत नाही. पण घटना परराष्ट्रातील असून सत्य आहे. म्हणून सांगाविशी वाटते.

एक क्ष गृहस्थ एका गावात राहत होता. बरीच माया व स्थावर इस्टेट होती. मुल बाळ नव्हते. वय झालेलं होतं. असाच एक वेळ आरामखुर्चीत बसला असताना दोन तरुण मुलं त्याच्या घरी आली. त्यांनी आपली ओळख त्याच्या दूरच्या नातेवाइकाशी आपले नाते कसे आहे हे दाखवून दिले. म्हाताऱ्यानी आपल्या नात्यातलीच मुले आहेत समजून त्यांना आश्रय दिला. मुलांचा प्रेमळपणा पाहून म्हाताऱ्यानी सर्वस्व त्यांना द्यायचे मनात ठरवले. दिवस जात होते. शेजारी पाजारी यांना पण म्हाताऱ्याजवळ नातेवाईक आले हे समजले होते. एक वर्ष गेले. एकदा मुलांनी म्हाताऱ्यास आपल्या गावी घेऊन जाण्याची टूम काढली. म्हातारा राजी झाला आणि एके रात्री ही दोन मुलं आणि म्हातारा मोटारीतून प्रवासाला निघाली. अन् दुसरे दिवशी दोघेही परत आले. शेजाऱ्यांनी म्हाताऱ्याबद्दल चौकशी केली, त्यावेळी त्यांनी त्यांना गावाला सोडून आल्याची थाप मारली.

त्याच गावात एक नामांकित शिक्षक राहत होता. विद्वान आणि शुद्ध चारित्र्याचा शिक्षक म्हणून त्याची ख्याती होती. नुकताच तो निवृत्त झाला होता. सुखासमाधानात दिवस काढीत होता. त्याच्या स्वप्नात हा म्हातारा आला आणि म्हणाला, “आपण आदर्श शिक्षक आणि नागरिक आहात. नागरिक या नात्यांनी आपण आपले कर्तव्य पार पाडाल म्हणून मी आपणास सांगू इच्छितो की माझा खून दोन तरुणांनी केला आहे. या दोन तरुणांनी मला मोटारीतून गावी जाण्यास गावाबाहेर आणले आणि या जंगलातील वळणावरील मोठ्या झाडाखाली अगोदरच खडा करून ठेवला होता तेथे मला पुरले आहे. मी तो मार्ग दाखवीत आहे. सध्या ती मुलं माझ्या घरात दारू पित बसली आहेत. ते घर व मुलं मी दाखवीत आहे. (येथे स्वप्नात ते झाड व ती दोन्ही मुलं शिक्षकास दिसली) आता आपण उठून पोलिसात रिपोर्ट करून गुन्हेगारास शासन मिळेल असे करा.” असे म्हणून तो म्हातारा गेला. स्वप्न संपले. शिक्षक जागे झाले. या विलक्षण स्वप्नाने ते अस्वस्थ झाले. पण तो म्हातारा कोण हे काही लक्षात येईना. त्यांनी स्मरणशक्तीला खूप ताण दिला पण त्यांच्या ओळखीच्या सर्वात तो कोठेच नव्हता. अपचन किंवा काहीतरी केव्हातरी खुनाच्या केसेस वाचल्या त्याचाही हा परिणाम असू शकेल असे समजून शिक्षक स्वप्न विसरले.

दुसरे दिवशी शिक्षक झोपले आणि त्यांना तोच म्हातारा स्वप्नात दिसला. म्हातारा स्वप्नात सांगत होता, “आपण अविश्वास दाखवू नये. मला या रस्त्यांनी असं नेलं. या झाडाखाली पुरलंय आणि ती दोघं मुलं परत या घरी आली. विश्वास ठेवा हे सर्व खरंय, तुम्ही नागरिक या नात्यानी या खुनास वाचा फोडलीच पाहिजे.” स्वप्न संपले. शिक्षकाची झोप खाडकन उघडली. त्यांनी परत स्मरणशक्तीला ताण दिला. पण व्यर्थ. काही केल्या तो माणूस कोण हे त्यांना आठवेना.

तिसऱ्या दिवशी शिक्षक झोपले आणि स्वप्नाची पुनरावृत्ती झाली. शिक्षक जागे झाले. त्यांनी मनाचा दृढ निश्चय केला आणि पोलिसमध्ये तक्रारीवजा अर्ज देऊन खुनाचा तपास लावून माझे मनःस्वास्थ्य मला परत मिळवून द्यावे अशी विनंती केली. अर्जात संपूर्ण स्वप्नाचा तपशील दिला होता. पोलीस अधिकारी त्यांना ओळखत होता व मान पण देत होता. हसून तो म्हणाला, “सर! स्वप्नावरून गुन्हेगार तपासण्याची मानवी इतिहासातील ही पहिलीच घटना असू शकेल. असो. गाडीत बसा. तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गाने गाडी जाईल. माणसं बरोबरच आहेतच.” शिक्षक गाडीत बसले. स्वप्नात जो मार्ग दिसला, त्या मार्गावरून गाडी चालू लागली. आता जंगल लागले. एक वळण लागताच शिक्षकाने गाडी वळणावरच थांबायला लावली. गाडी थांबली. सर्वजण खाली उतरले. शिक्षकानी जवळच्या झाडाखाली जागा दाखवली. अवघ्या काही मिनिटातच खड्ड्यात एक प्रेत सापडलो. आता पोलीस अधिकारी चक्रावले. स्वप्नाप्रमाणे प्रेत सापडले तर मारेकरी निश्चितच सापडतील. नंतर गाडी शिक्षक सांगतील त्या दिशेला धावू लागली. एका घरासमोर गाडी थांबली. शिक्षक व पोलीस आत गेले. दोन तरुण दारू पिताना दिसताच शिक्षकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून “हीच ती मुलं” असे सांगितले. पोलिसांनी रीतसर खटला भरला. कोर्टानी शिक्षकाचे स्वप्न ग्राह्य धरून दोन्ही गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांचे वय लक्षात घेऊन जन्मठेपेची शिक्षा दिली.

येथे ना फ्राईड आहे ना भविष्य. आहे तो एक चमत्कारिक सत्य घटना. निसर्गाची विलक्षण लहर!

स्वप्नाचे प्रकार ओळखणे

येथपर्यंत आपण “स्वप्ने” या विषयाचे स्वरूप, त्यावर केलेले लिखाण, आणि जाळीजळमटं बघितली. ती यथाशक्ती “स्वच्छ” करण्याचा मी प्रयत्न केला आहे. स्वप्न विश्लेषण हे महत्व्हाचे आहे व ते अत्यंत प्रामाणिकपणे करायला पाहिजे. शक्य तो पूर्वग्रह नसावा.

स्वप्नाचे दोन प्रकार आहेत. पहिला निरर्थक आणि दुसरा सूचक. हे दोन प्रकार कसे ओळखायचे हेच म्हत्वाचे आहे. हा महत्व्हाचा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वप्नास कोणत्या प्रकारात टाकायचे हे निश्चित करता येत नाही. गोंधळलेल्या मनस्थितीत पहिल्या प्रकारचा स्वप्नास दुसऱ्या प्रकारात टाकणे आणि दुसऱ्यास पहिल्या प्रकारात टाकणे अशे प्रकार होतात. याचा परिणाम शून्य. नुसता गोंधळ. खोटेपणा उगाच जाणवू लागतो, आणि आपली चूक लक्षात न घेता “स्वप्न सूचक नसतातच” असे विधान ठोकून आपल्या चुकीचे खापर “स्वप्ना”वर टाकून माणसे मोकळी होतात. याकरिता मुळ स्वरूप पूर्णपणे बघायला हवे. दोन अधिक दोन बरोबर पाच, पाच अधिक तीन बरोबर आठ आणि आठ अधिक दोन बरोबर दहा. अशा प्रकारची बेरीज पुढे शेवटपर्यंत जरी बरोबर आली तरी ती “चूक” ठरून शून्य गुणास पात्र ठरते कारण मूळ बेरीजच मुळी दोन आणि दोन पाच हीच चूक आहे. स्वप्न विश्लेषणापुर्वी अशी मूळ चूक होता उपयोगी नाही.

पहिली गोष्ट म्हणजे स्वप्न पूर्णपणे लक्षात ठेवा. काही दिवस ते जमणार नाही. पण अवधान दिसल्यास ते निश्चित जमू शकत. मनुष्य स्वप्न विसरत नसतो. त्याकडे अवधान न दिसल्यामुळे ते स्मरत नाही. ज्यांना स्वप्न लक्षात राहत नाहीत त्यांना जर त्यांच्या स्वप्नात वाघ मागे लागलेला व साप पुढे आलेला आहे हे दिसले तर ते ओरडतील, “मेलो, मेलो, वाचवा.” आपण विचारले की काय झाले तर ते बरोबर सांगतील, “अहो, स्वप्नात बघ मागे व साप पुढे दिसला अन् मी भ्यालो.” आता हे स्वप्न कसं लक्षात राहिलं तर ते त्यास ‘भयाण’ वाटलं म्हणून. असो. स्वप्न पूर्णपणे घड्याळाप्रमाणे (Clock-wise) लक्षात ठेवा. जाग येताच उलट क्रमाने जावे (Anti Clock-wise) म्हणजे स्वप्नाचा सूचक भाग कोणत्या वेळी दिसला हे स्पष्ट होईल. प्रामुख्यानी स्वप्नात दिसणाऱ्या वस्तूचे किंवा दृश्याचे रंग लक्षात ठेवावे. मृत व्यक्तीचे, तसेच इतरांचे बोलणे पण लक्षात ठेवावे. सूचक भाग काढताना याची मदत होते.

दुसरी गोष्ट म्हणजे आपली झोप मोजून ठेवली पाहिजे याचा उल्लेख मी पहिल्या भागात केला आहे म्हणून पुनरावृत्ती टाळतो.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्लेषण. संपूर्ण स्वप्न लक्षात ठेऊन त्यातील दृश्याची पूर्ण तपासणी करा. ती तपासणी करताना त्यातील घटना याची तुमच्या जागृत मनानी नोंद घेतेलेली असेल तर ती घटना ‘निरर्थक’ या सदरात मोडेल. सुप्त मनावर पडलेल्या दबावाचा प्रत्याघात जर स्वप्नात असेल तर तो भाग पण ‘निरर्थक’ सदरात मोडेल. म्हणजेच जागृत मनावरील दबावाचा प्रत्याघात आणि सुप्त मनावरील दबावाचा प्रत्याघात जर असेल तर तो भाग – ते दृश्य – ते बोल – निरर्थक ठरतील. पण जर स्वप्नात जागृत मनावरील कोणताच दबाव नसलेले आणि सुप्त मनावर कोणताच दाब नसलेले दृश्य दिसले असेल तर ते स्वप्न निश्चित सूचक समजावे. त्या भागाचा, त्या दृश्याचा, त्या बोलाचा अन् त्या रंगाचाही निश्चित सूचक अर्थ असतोच. याचे अधिक स्पष्टीकरण करण्याकरता मी काही उदाहरणे खाली देत आहे. वाचकांनी ती बारकाईने वाचावीत. स्वप्नाचा काढता येईल तेवढा कीस काढावा व प्रत्याघाती स्वरूप नसलेले भाग – दृष्य बघावे. ते दृश्य, भाग, वस्तू ही कसची प्रतीकं आहेत हे स्वप्न्दृश्यात सापडू शकते. तसेच त्याचे फळ पण. स्वप्न घाणेरडं आहे हे बघू नका. ते प्रत्याघाती आहे का नाही एवढंच अतिमहत्त्वाचे आहे. कामवासना दडलेल्याची छटा असलेल्या घटना दिसू शकतात. त्याच्याशी तुमचा प्रामाणिकपणाच साक्षीदार आहे. फ्राईड १०० टक्के बरोबर नाही हे जरी खरे असले तरी तो १०० टक्के चूकही नाही हे लक्षात घ्या. फ्राईडच्या सिद्धांताला डावलूनही तुम्हाला सूचक भाग सापडू शकतो. तसाच तो तुम्ही दडपू पण शकता. कारण तुमची स्वप्नं शेवटी तुमचीच आहेत, दुसऱ्याची नाहीत. लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला फसवू शकत नाहीत.

सुप्त मन, जागृत मन, जाणीव, नेणीव, घात, प्रत्याघात या शब्दांची कसरत जर अवघड असेल वाटत असेल तर त्यापेक्षाही अधिक सोपी युक्ती सांगतो. तीही तितकीच उपयोगी पडते.

स्वप्नात दिसलेले पूर्ण दृश्य लक्षात ठेवा. यात जे जे पूर्वी बघितलेलं जशास तसं दिसत असेल तर ते निरर्थक म्हणून वजा करा. हे करीत असताना जर दृश्यातील कोणत्याही भागात थोड जरी फरक असेल असे आढळते तो भाग निश्चित सूचक समजावा. हे समजून स्वप्नाची छाननी करता येईल एवढी करा. सूचक भाग आढळल्यास स्वप्नदृश्यात बघून स्वप्नफल बघता येईल. प्रत्येक वेळी स्वप्न्फल बघण्याची घाई करू नका. सूचक भागावर लक्ष केंद्रित करून साधा विचार केला तरी तुमचा अंदाज स्वप्न्फलाशी जुळल्याचे तुम्हास आढळून येईल.

उदाहरणार्थ, (१) समजा तुम्ही श्री. चिन्मयानंदाच्या व्याख्यानाला गेलेले आहात. त्यांचे भगव्या वस्त्रातील आगमन, भगवा ध्वज, त्यांच्या गुरूचा ठेवलेला फोटो, त्यावरील पुष्पहार हे आपण पहिल्यांदाच बघत असाल. नंतर त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी होते. मधून मधून विनोदाची कारंजी उडत असतात आणि नंतर तुम्ही प्रसन्न मानाने घरी येत असता. तुमच्यावर भाषणाचा खूपच प्रभाव पडलेला असतो. त्यांचा सात दिवसाचा ज्ञानयज्ञ संपवून ते मुंबईस रवाना होतात. यात सहा महिने होऊन जातात. आता तुमच्या मनावर काही दडपण नाही. सुप्त मनावर पण काही दाब नाही. अन् एका रात्री तुमच्या स्वप्नात श्री. चिन्मयानंद येतात. त्यांचा लावलेला गुरूचा फोटो दिसतो. ते भगव्या वस्त्रातच असतात. मंडपात श्रोते बसलेले दिसतात. मधोमध लावलेला ध्वज दिसतो. तो तुम्हाला पिवळ्या रंगाचा दिसतो आणि तुम्हास जाग येते.

Swapnanchi-Duniya-6

वास्तवता

आता या स्वप्नाचे विश्लेषण केले तर त्यांचे स्वप्नात येणे, त्यांच्या गुरूचा फोटो दिसणे, बसलेले श्रोते दिसणे यात म्हणजे एवढ्या भागात तुम्ही पाहिलेल्या वास्तव्तेतील दृश्यांचा प्रत्याघात आहे. म्हणून हा भाग सूचक न ठरता निरर्थक ठरतो. मुळातला भगवा ध्वज हा तुम्ही पिवळ्या रंगात बघितला.

Swapnanchi-Duniya-7

सूचक भाग – काळा ध्वज

यात वास्तवतेचा प्रत्याघात नसून पिवळ्या रंगाचा ध्वज हाच फक्त सूचक भाग आहे. पिवळा ध्वज पाहणे म्हणजे भांडण, मानहानी आणि मानसिक त्रास याचे द्योतक होय.

उदाहरण (२) – समजा तुम्ही रेल्वेनी प्रवास करीत आहात. तुमचा डब्यात एक उत्तम पोषाख केलेली शिकली सवरलेली तरुणी आली आहे. तुमच्या जवळच बसली आहे. गाडी चालू होते. एक दोन स्टेशने जातात. अन् टी.टी.आय. डब्यात येतो. सर्वांची तपासणी करीत असताना त्या तरुणी जवळ तिकीट नसल्याचे कळते. टी.टी.आय. दम भरतो. दंड भरत असाल तर रसीद फाडतो, नाहीतर पुढील स्टेशनवर उतरून पोलिसांच्या हवाली करतो. काय ठरवायचं ते ठरवा. ती तरुणी दंड भरून रसीद घेते. पुढील स्टेशनवर तुम्ही उतरून जाता. आता तुम्हाला उगीचंच वाटतं की इतक्या सुशिक्षित बाईने असं करायला नको होतं. तुम्हाला थोडसं आश्चर्य पण वाटतं की सुशिक्षित माणसं असं पण वागू शकतात.

या घटनेला सहा महिने होऊन जातात, अन् तुम्हाला स्वप्न पडत. त्यात तुम्ही रेल्वेने प्रवास करीत आहात. तुमच्या शेजारी एक सुशिक्षित स्त्री बसलेली आहे. दुसऱ्या स्टेशनवर टी.टी.आय. तुमच्या डब्यात येतो. सर्वांचे तिकीट तपासतो. इकडे तुमची तारांबळ उडते. आता टी.टी.आय. तुम्हाला तिकीट दाखवा म्हणतो. तुम्ही सारे खिसे तपासता. पिशवी तपासता, पाकीट तपासता पण तिकीट सापडत नाही. डब्यात काही जणांच मिश्कील हास्यहि तुम्हाला जाणवतं आणि तुम्ही टी.टी.आय. कडे केविलवाणी बघ्ताहात अन् तुम्हाला जाग येते.

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर रेल्वेचा प्रवास, त्यात तुमच्या डब्याला आलेली व जवळपास बसलेली तरुणी व तिकीट तपासण्याकरता आलेला टी.टी.आय. हे सर्व प्रत्याघाती स्वरुपात मोडतात. म्हणून एवढा भाग निरर्थक. परंतु टी.टी.आय. तुमच्या जवळ येऊन तिकीट मागतो. तुम्ही तिकीट काढलेलं असूनही तुम्हाला ते सापडत नाही. ते हरवलेलं असत एवढा भाग महत्त्वाचा. आणि टी.टी.आय. नी स्वप्नात तिकीट मागितलं असताना सापडत नाही याचा अर्थ विपुल संपत्ती मिळण हा आहे. अशा स्वप्नाची वेळ तपासल्यास निश्चित काळही काढता येतो.

उदाहरण (३) – तुमचा ऑफिसर खूप खडूस आहे. फटकन बोलून त्याला अपमान करायची सवय आहे. त्याच्या केबिनमध्ये दोन तीन मुळी बसलेल्या आहेत. तुमचा तुम्ही पाठवलेला ड्राफ्ट तो वाचत आहे. त्यात बऱ्याच चुका न कळत राहून गेल्या असतात. आता तो बेल वाजवून तुम्हास बोलावून घेतो. तो तुम्ही केबिनमध्ये येताच फायर करतो. मुली अधूनमधून फिदीफिदी हसतात. तुम्हाला मनातून खूप राग आलेला असतो. पण तो तुम्ही गिळून, ओशाळे होऊन परत कामाला लागता.

वास्तवता

वास्तवता

या नंतर केव्हातरी तुम्हाला स्वप्न पडत. साहेबांच्या केबिनमध्ये तुम्ही गेलेले आहात. तो फायर करीतच असतो. तेथे कोणीच नसतं. तुम्हाला खूप राग आलेला असतो. त्या रागाच्या भरात तुम्ही टेबलावरील रूळ घेऊन त्याच्यावर उगारता. अशा वेळी बचावाकरता तो आपले दोन्ही हात डोक्यावर घेतो अन् तुम्ही थक्क होता. कारण तुम्हाला साहेबांच्या दोन्ही हाताला महारोग झाल्याचे दिसते. हाताची बोटे झडलेली दिसतात अन् तुम्हाला जाग येते.

सूचक भाग - झडलेली बोटं

सूचक भाग – झडलेली बोटं

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर स्वप्नातील साहेब, त्याचं फायर करणं, तुमचा राग व त्या भरात तुम्ही त्यांच्यावर रूळ उगारणे हे पूर्वी तुमच्या झालेल्या अपमानाचा प्रत्याघात आहे म्हणून एवढा भाग निरर्थक होय. परंतु नेहमी साहेबाची बोटं महारोगानी झाडलेली दिसणं हे सूचक आहे. स्वप्नात महारोगी येणे म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि मानमरातब होय. स्वप्नाच्या वेळेनुसार धनलाभ निश्चितच असतो.

उदाहरण (४) तुम्ही रस्त्यांनी फिरावयास चाललेले आहात. चालत चालत दूर गेल्यानंतर तुम्हाला रूळ दिसताहेत आणि आता तुम्ही रुळावरून चालत आहात आणि तिकडून रेलगाडी धूर ओकीत तुमच्या अंगावर येत आहे. अशा वेळी तिथेच असलेल्या पुलावरील खांबाजवळ तुम्ही पळत जाऊन बाजूला होता. रेल्वे तुमच्या जवळून निघून जाते.

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर तुमचे साध्या रस्त्यावरून रुळावर जाणे म्हणजे तुमचा मार्ग बदल होणे होय. तो चांगल्या वाईटाकडेही असू शकतो. रेल्वे धूर सोडीत अंगावर येणे म्हणजे जीवन कळपात करणारी संकटे येणे होय.

उदाहरण (५) सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या स्वप्नात साप हा कधीतरी येतोच. समजा तुम्ही कधीतरी मित्राबरोबर महाराजबाग बघण्याकरता गेलेले आहात. तेथील पशुपक्षी व सापही पाहता. नंतर सर्व विसरून जाता.

वास्तवता

वास्तवता

पुढे केव्हातरी तुम्हाला स्वप्नं पडत. स्वप्नात तुम्ही दुसऱ्या एका मित्रास महाराजबाग दाखवत आहात. सर्व पशु पाहत असताना एकच गोंधळ उडतो. कारण मोकळे साप बाहेर आलेले असतात आणि नंतर इतर साप त्यांना साथ देतात. चोहोकडे पळापळ सुरु होते. या पळापळीत तुम्ही खूप जोरात पळू लागता. एक साप तुमच्या मागे जोरात फूत्कार टाकीत येत असतो. शेवटी तो तुम्हाला गाठतो आणि तुमच्या उजव्या हाताला कडकडून चावतो. तुम्ही भीतीने ओरडता आणि तुम्हास जाग येते.

सूचक भाग - साप मागे धावतो व पुढे चावतो

सूचक भाग – साप मागे धावतो व पुढे चावतो

या स्वप्नाचे विश्लेषण केले तर महाराजबाग स्वप्नात येणे हे प्रत्याघाती स्वरूप आहे. साप बाहेर येणे व तो तुमच्या मागे येणे येथे सूचक भाग सुरु होतो. नंतर तो तुम्हास कडकडून चावतो हे सूचक आहे. साप सर्वसाधारणपणे सर्वांच्या स्वप्नात येतोच. कधी फूत्कार सोडीत आहे तर कधी हातापायास वेटोळा घालीत आहे. तर कधी नुसता सळसळत जात आहे. पण साप क्वचितच स्वप्नात चावतो. आता तो तुम्हास चावला आहे इह अत्यंत सूचक आहे. याचा अर्थ तुम्ही लक्षाधीश होणे आहे. जुन्या काळच्या भाषेत साप सुवर्णमुद्रांचा मालक बनतो. आता त्याची किंमत लाखात मोजावी लागते. थोडक्यात म्हणजे आर्थिक लाभ व स्थावर इस्टेट येणे हा होय.

एक संकेत असाही आहे की गरोदर स्त्रीस साप चावल्यास किंवा दिसल्यास मुलगा होतो. पण त्यातही प्रकार आहेत. मलूल दिसल्यास मुलगी होते. पांढरा दिसल्यास मुलगा. चावला तर मुलगाच हे शंभर टक्के.

वरील उदाहरणांवरून स्वप्नाचा अर्थ कसा काढावा हे कळेलच. मी प्रकरण ३ मध्ये या “विश्लेषण” पद्धतीने स्वतःच्या व इतरांच्या स्वप्नाचेही “सूचक” भागावरून भविष्यात घडणाऱ्या घटनांचे स्पष्ट स्वरूप पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले. वाचकांनी या पद्धतीने थोडा अभ्यास केल्यास कमीत कमी स्वतःच्या स्वप्नाचा अर्थ निश्चित काढता येईल असा विश्वास वाटतो.

येथे प्रामुख्याने भारतीय तत्त्वेत्यांची स्वप्नावरील मत जाणून बुजून टाळली आहेत. उगीचंच “जग हे स्वप्नवत-स्वप्नवत संसार” “ब्रम्ह सत्य जग मिथ्या” अर्जुनास कृष्णाने गीतेत असे सांगितले आहे, असे म्हणून सांगितलेले तत्त्वज्ञान, याचा खऱ्या अर्थी या स्वप्नाशी तिळमात्र संबंध येत नाही. उगीचंच दुसऱ्या विषयात त्याचा संबंध नसताना अध्यात्माची चर्चा घुसडून “पांडित्य” दाखवण्याची मला गरजच भासली नाही. एक निश्चितपणे सांगता येईल की आपल्यात कोणीही स्वप्न विश्लेषणाला हात लावलेला नाही. उलटपक्षी वाईट स्वप्न पडल्यास (वाईट म्हणजे कसे हे न सांगता) त्याचा परिणाम टाळण्यापेक्षा अंधश्रद्धेचा आश्रय घेण्याचा मार्गच दाखवला आहे. मला काहीही मान्य नसल्यामुळे मी शब्दही लिहला नाही.


No Comments

सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल

या भागात स्वप्न विश्लेषण पद्धतीप्रमाणे स्वप्न्फल सांगितले आहे. ते किती तंतोतंत आहे हे स्पष्ट होईलच. ती स्वप्ने इंग्रजी किवा इतर भाषेतील भाषांतर नव्हते तर मला पडलेली स्वप्ने आणि इतरांनी मला सांगितलेली स्वप्ने आहेत. नावानिशी मी करता येईल तेवढा उल्लेख केला आहे. यातील सर्व व्यक्ति आज हयात आहेत.

स्वप्न क्रमांक १ 

माझे मित्र श्री. खन्ना हे माझ्या बरोबरच विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. त्यांची बदली गोंदियाला झाली. ते तेथे रुजू झाले. चार एक महिन्यांनी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी बघतोय की श्री. खन्ना हे काळी शेरवानी, चुडीदार पैजामा व डोक्यावर एक अत्यंत घाणेरडी टोपी घालून आपल्या मित्राच्या खांद्यावर हात ठेऊन चालले आहेत. मी त्यांना म्हणतो; ‘खन्नासाहेब, चांगल्या कपड्यांवर निदान चांगली टोपी तरी घालायची.’ इतक्यात मला जाग आली. समोर घड्याळात बघितले तर पाच वाजले होते. माझी झोप सहा तासाची आहे. मी अकराला झोपतो व पाचला उठतो. स्वप्न संपले व जाग आली त्यावेळी पाच वाजले होते. म्हणजे स्वप्नाचा परिणाम चोवीस तास ते तीस दिवसाच्या आतला. योगायोगाने श्री. खन्ना त्याच दिवशी नागपूरला आले. मी त्यांना म्हणालो, ‘खन्नासाहेब, आज सकाळीच मला स्वप्न पडलं. तुम्ही स्वप्नात अत्यंत घाणेरडी टोपी डोक्यावर घातलेली. यावरून मी सांगतो की तुमची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून लवकरच होईल.’ यावर श्री. खन्ना म्हणाले, ‘डोईफोडे, मी परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही, तेथे स्वप्नावर तरी विश्वास ठेवणार का? मी तर राजीनामा देण्याकरता आलेलो. परंतु साहेबांनी मला एक महिन्यानी देण्यास सांगितले आहे म्हणून परत चाललो आहे.’ चहा फराळ झाला आणि श्री. खन्ना रात्रीच्या गाडीने गोंदियाला रवाना झाले. दुसरे दिवशीच नागपूरच्या त्यांच्या मित्राला श्री. खन्नाची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याची तार मुंबईहून आली. सुदैवाने त्यांना विक्रीकर अधिकारी म्हणून नागपुरच मिळालं. श्री. खन्ना हे आज डेप्युटी कमिशनर म्हणून काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण कसे केले ते सांगतो. श्री. खन्ना यांनी दोन मित्रांच्या खांद्यावर हात ठेवले होते. हे दोघेही वास्तव्तेतील त्यांचे मित्र म्हणून सूचक नव्हते. श्री. खन्ना हे कधीच टोपी घालीत नाहीत. परंतु स्वप्नात त्यांच्या डोक्यावर अत्यंत घाणेरडी टोपी होती. वास्तवतेत टोपी कुठेच नव्हती त्यामुळे तिचे स्वरूप प्रत्याघाती नव्हते म्हणून तेवढीच ‘घाणेरडी टोपी’ या स्वप्नाचा सूचक भाग. घाणेरडी टोपी डोक्यावर असणे याचा अर्थ सतत प्रगती-उत्कर्ष असा आहे. श्री. खन्ना यांची प्रगती-उत्कर्ष कसा झाला ते पहा. अगोदर विक्रीकर निरीक्षक , नंतर विक्रीकर अधिकारी, नंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि आज आहेत विक्रीकर उपयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई!

स्वप्न क्रमांक २

मी मुंबईला होतो. कार्यालयातील बऱ्याच जणांना मी स्वप्नाचे अर्थ सांगतो याची माहिती होती. माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगी होती. तिचे लग्न होऊन सहा महिने झाले होते. तिला एक स्वप्न पडले. तिने आपल्या मनात ते स्वप्न वाईट असल्याचा धसका घेतला. सकाळपासून मी कामात असल्यामुळे ती माझ्याशी बोलूच शकली नाही. शेवटी चार वाजता मी सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडलो. त्या वेळी तिने मला गाठून थांबवले. ‘माझ्या स्वप्नाचा जो अर्थ असेल ते सांगा. मी माझ्या मनाची तयारी केली आहे.’ अत्यंत विमनस्क मनःस्थितीत ती बोलत होती. मी तिला म्हणालो, ‘अगोदर शांत हो. निसं:कोचपणे स्वप्न सांग. मी निश्चितच अर्थ सांगेन.’ त्यावर ती म्हणाली, ‘मी माझ्या स्वप्नात लग्नातला शालू काढायला गेले तर पेटीतून उंदीर पळाला. शालू बघते तर त्याला मोठं छिद्र उंदरांनी कुरतडून केलेलं.’

मी तिला म्हणालो, ‘काहीही घाबरण्यासारखं नाही. पण आता साडेचार होतात. उद्या सायंकाळचे साडेचार पर्यंत तुझी मनःस्थिती पार ढासळून जाईल. भांडणे व कटकटी खूप. नंतर सर्व ठीक होईल.’ ‘बस एवढच’ म्हणून ती आपल्या जागेवर बसली.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती ऑफिसमध्ये आली. झोप नसल्यामुळे तिचे डोळे सुजलेले दिसत होते. मी काहीच न बोलता कामास लागलो. बरोबर, तीन वाजता तिची आणि हेडक्लार्कची अशी जुंपली की साहेबांना केबिनमधून बाहेर येऊन मध्ये पडावे लागले. मी मात्र तिच्याकडे न पाहताच काम करीत राहिलो.

दुसरे दिवशी सकाळी येताच ती म्हणाली, ‘काका, कालचा दिवस विसरणे शक्य नाही. परवा घरी गेल्यापासून सर्वांशी भांडणं झाली. राहिलं साहिलं ते काळ हेडक्लार्कशी झालं. आता तर काही नाही ना?’ मी शांतपणे म्हणालो, ‘बाळ, हा तुझ्या स्वप्नात आलेल्या उंदराचा परिणाम बरं.’

या पूर्ण स्वप्नाचे विश्लेषण असे केले – या पूर्ण स्वप्नात कोठेही प्रत्याघाती स्वप्रूप नाही. शालू म्हणजे उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र. छिद्र अन् तेही कुरतडून म्हणजे जवळच्या नातेवाईकांशी बेबनाव होऊन असलेले संबंध तुटणे. शिवाय पेटीतून बाहेर पडताना उंदीर दिसणे म्हणजे मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडण्याची सुचना.

स्वप्न क्रमांक ३ –

माझ्या बरोबर श्री. निराळे हे विक्रीकर निरीक्षक म्हणून नागपूरला काम करीत होते. श्री. निराळे हे एम. ए., एम. कॉम., एलएल.बी. असून देखील विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होते. याचं आम्हाला फारच आश्चर्य वाटायचं. एकदा त्यांनी स्वप्न सांगितलं. स्वप्नात ते कारनी प्रवास जरित होते. दुसरी एक कार पाठीमागून येऊन पुढे गेली. याचा अर्थ काय? श्री. निराळे हे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. तसेच एम.पी.एस.सी. च्या पण. मी त्यांना ताबडतोब म्हणालो, ‘निराळे, तुम्ही एम.पी.एस.सी. च्या परीक्षेत पास होऊन विक्रीकर अधिकारी व्हाल परंतु यु.पी.एस.से. चे काही खरे नाही. अवघ्या तीन दिवसांनी त्यांची निवड विक्रीकर अधिकारी म्हणून झाल्याचे पत्र आले. आज श्री. निराळे, असिस्टंट कमिश्नर म्हणून मुंबईस काम करीत आहेत.

या स्वप्नाचे विश्लेषण असे – स्वतः मोटार चालवणे व ती सुरळीत हे प्रगती आणि सुरळीत आयुष्य जाण्याचे द्योतक आहे. श्री. निराळे हे एम.पी.एस.सी. तसेच यु.पी.एस.सी. च्या परीक्षेस बसले होते. म्हणून एम.पी.एस.सी.तील निवड निश्चित होती. स्वतः कार वापरीत किंवा चालवीत नसत म्हणून प्रत्याघाती स्वरूप कोठेच नाही. सबब कारमधून जाणे हाच भाग सूचक.

स्वप्न क्रमांक ४ –

मी मुंबईला ज्या मित्राकडे राहत असे त्याचं दुमजली घर औरंगाबादला होतं. स्वप्नाच्या गप्पा चालत असत. एकदा त्याला एक स्वप्न पडलं. त्यात त्याचे बत्तीस दात पडलेले दिसले. त्याला ताबडतोब जाग आली. त्याने दिवा लावला. दात खरंच पडले की काय हे तोंड दाबून पाहिले. त्याला बराच घाम आला होता. सकाळी त्याने मला स्वप्न सांगितले. मी गंभीर होऊन गप्पच बसलो. तो खनपटीलाच बसला. मग मी गंभीर होऊन सांगितले की तुझे औरंगाबादचे घर विकावे लागेल किंवा त्यात तुला राहता येणार नाही. याचा काळ मी तीन महिन्यांचा दिला होता. त्याने माझ्या माघारी मला खूप शिव्या दिल्या. ब्राम्हण जातीचा नेहमीच्या सर्व जाती करतात तसा उद्धार पण केला.

तो दिवाळीकरता औरंगाबादला एक महिन्याची रजा घेऊन गेला. परत आला तर अगदी सुन्न होऊनच. मी सकाळी काही बोललोच नाही. मूड नसेल म्हणून ऑफिसला निघालो. सायंकाळी तो माझ्या अगोदरच घरी आला. आता तो ताजातवाना झाला होता. मी घरी येताच त्याने सांगितले की ऐन दिवाळीत मुला-मुलांची भांडणे झाली अन् मी मध्ये पडलो. एवढंच निमित्त झालं आणि सर्व बिरादरानी काठ्यांनी मारावयास सुरुवात केली. माझी बायको मध्ये पडली तर तिच्यावरही काठी बरसली. पोलीस केस केली. मन उद्विग्न झालं. घर विकून आलो. सर्व पैसे वडिलांनी घेतले. आता मजजवळ फक्त दोन रुपये आहेत. एकूण मी सांगितलं, त्याप्रमाणे त्याचं घर त्याला विकावं लागलंच.

विश्लेषण :- प्रत्याघाती स्वरूप नाही. दात पडणे एवढेच सूचक. याचा अर्थ स्थावर मालमत्ता नष्ट होणे, आर्थिक नुकसान आणि अत्यंत कटकटी.

स्वप्न क्रमांक ५ –

मी एम. ए. ला बसलो होतो. मजजवळ एकही पुस्तक नव्हतं. तशात एकाची ओळख झाली. तो एम.ए. चा नियमित विद्यार्थी होता. परिचय झाला आणि आमची रोजची सायंकाळची बैठक व्हायची. स्वप्नाचा विषय निघाला आणि मी त्याला स्वप्न लक्षात कसं ठेवायचं, त्याची वेळ कशी काढायची वैगरे सर्व समजावून सांगितले. सर्व लक्षात ठेऊन पडलेली स्वप्नं तो लिहून ठेवी. सायंकाळी सांगत असे. दिवाळीच्या सुटीत तो गावी गेला. त्याला एक मुलगी सांगून आली. मुलगी पसंत पडली. त्यांनी होकार पण कळवला. आता साखरपुडा ठरवायचा होता. तो नंतर ठरवू म्हणून तो नागपूरला आला. आठ दिवसांनी त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याच्या गावची त्याची मैत्रीण(जी वारली होती) आली. चेहरा अत्यंत मलूल होता. काहीही न बोलता खाली मान घालून निघून गेली. त्याने सर्व स्वप्न सांगितले. मी गंभीरपणे त्याला म्हणालो, ‘राग येत नसेल तर स्पष्ट सांगतो. तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी तुमचं लग्न होणार नाही.’ यावर तो खूप हसून म्हणाला, ‘तुम्ही काढलेल्या स्वप्नाचा अर्थ अगदी चुक आहे. आठ-दहा दिवसात साखरपुडा ठरेल. तसे पत्र येईलच. तुम्हाला घेऊनच जाईनच.’ आठ-दहा दिवस तर गेलेच. पण पत्र नाही. यांनी पत्र पाठवली परंतु उत्तरच नाही. तीन महिन्यांनी पत्र आलं. मुलाला मंगळ असल्यामुळे मुलीकडील माणसांनी मुलगी देण्याचे रद्द केले आहे. आता मात्र माझा मित्र खूपच घाबरला. आता आपले लग्न होणे शक्य नाही इथपर्यंतचे त्याचे मत झाले. सोयरिकी येणे बंद झाले. कोणतीच हालचाल दिसेना. अशा मनःस्थितीत त्याला परत एक स्वप्न पडले. स्वप्नात तीच मैत्रीण(मृत) आली. चेहरा प्रसन्न होता. तुळशी वृन्दावनासमोरून काळी गाय गेली. त्याने स्वप्न सांगितले आणि मी कागद काढून नव्वद दिवसात तुमचे लग्न होईल असे लिहून दिले. परीक्षा होताच तो गावी गेला आणि एके दिवशी त्याच्या लग्नाची पत्रिका आली. स्वप्नाचा अर्थ सांगितल्यापासून लग्नाचा दिवस ८८वा येत होता.

विश्लेषण :- जी मैत्रीण स्वप्नात आली तिला अंतर्मनातून मित्राबद्दल आकर्षण होते. तिचा मलूल चेहरा आनंददायक घटना घडणार नाही हे दर्शवित होता. म्हणून पहिल्या स्वप्नात मुलगी पसंत करूनसुद्धा लग्नासारखी आनंदी घटना घडणार नाही हा अर्थ काढला.

दुसऱ्या स्वप्नात ‘प्रसन्न चेहरा, तुळशी वृंदावन – समोर काळी गाय जाणे’ हे सूचक होते. काळी गाय स्वप्नात येणे हे मंगलकार्य होणारच याचे चिन्ह आहे. म्हणून लग्न होणारच हे मी निश्चित मनाने सांगितले.

स्वप्न क्रमांक ६ –

जितकं स्वप्न घाणेरडं तितकं ते चांगलं असा अर्थ सर्वसाधारण नियम आहे. याचा एक नमुना. माझा एक मित्र. त्याला एका रात्री स्वप्नात मातृसंभोग घडला. त्यावेळी सकाळचे चार वाजले होते. मित्र पराकोटीचा घाबरला. त्याला डबडबून घाम आला होता. सकाळी पाच वाजता तो माझ्या घरी आला. स्वप्न सांगून त्यांनी वाटेल ते प्रायश्चित्त भोगायची तयारी असल्याचे सांगितले. मी त्याला म्हणालो, ‘प्रायश्चित्त आणि स्वप्नाचा कवडीचाही संबंध नाही. निसर्गाच्या सुचना पेढा बर्फीच्या प्रसादासारखे बदलत नसतात.’ असो. आता तुझ्या स्वप्नाबद्दल सांगतो. असं स्वप्न अत्यंत सूचक आणि शुभ असतं. तुझी केस कोर्टात चालू आहे. ती तु जिंकणारच. जर तु ही केस हरलास तर मी स्वप्नातही कोणाच्या स्वप्नाचा अर्थ सांगणार नाही. सहा महिन्यांनी सरकारनेच केस मागे घेऊन त्याला पूर्ण न्याय दिला. तो देखील विक्रीकर अधिकारी म्हणूनच निवृत्त झाला आहे.

विश्लेषण :- डॉ. फ़्राइद्च्य सिद्धांताप्रमाणे याचे विश्लेषण जर केलं तर “लैंगिक भूक” एवढ्यावरच याची बोळवण झाली असती. परंतु भारतीय तत्त्ववेत्त्याच्या अनुमानाने हे स्वप्न सर्वात शुभ मानले जाते. असे स्वप्न ज्यास पडते ती व्यक्ति जर संकटात असेल तर त्यातून मुक्त होतेच. तसेच व्यावसायिक-नोकर-विद्यार्थी आपआपल्या परीने प्रगतीकडे वाटचाल करून निश्चितच यशस्वी होतात. प्रत्याघाती स्वरूप नसल्यामुळे सर्व सूचक असे स्वप्न आहे.

स्वप्न क्रमांक ७ –

श्री. खन्ना हे विक्रीकर अधिकारी म्हणून नागपूरला आले होते. योगायोगाने मी त्यांच्या हाताखाली विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत होतो. माझी प्रकृती बरीच ढासळली होती. सोमवारचा दिवस होता. रविवारी मला स्वप्न पडले होते. रेल्वेतून मी प्रवास करीत होतो. गाडी दुसऱ्या रुळावरून चालली होती. पहिले रूळ खूपच लांब दिसत होते.

Swapnanchi-Duniya-12

जाग येताच मी घड्याळ बघितले. बरोबर सकाळचे पाच वाजले होते. गाडीने रूळ बदलणे म्हणजे बदली-स्थलांतर-बदल. मी खूप घाबरून ऑफिसमध्ये गेलो. साडेअकरा वाजता श्री. खन्नानी मला बोलावून घेतले. प्रकृती सांभाळण्याबद्दल त्यांनी उपदेश केला. मी भारावून गेलो होतो. मी त्यांना माझी बदली खूप दूर होणार असे सांगताच ते म्हणाले, ‘डोईफोडे, एखादे स्वप्न खरे ठरले म्हणून सर्वच स्वप्ने खरी ठरत नसतात.’ त्यांनी चहा मागविला. मी चहा घेऊन जागेवर बसलो. साडेचार वाजता दुपारी परत श्री. खन्नांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावले. मी परत येताच ते म्हणाले, ‘अहो, खरोखरच तुमची बदली मुंबईला झाली आहे. ही बघा आताच्या डाकेत आलेली ऑर्डर.’ मी सुन्न होऊन गेलो. पण इलाज नव्हता. गोष्ट अटळ होती. हा होता रेल्वेनी रूळ बदलण्याचा परिणाम.

विश्लेषण :- स्वप्नात गाडीने रूळ बदललेले दिसले हाच भाग सूचक असल्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकताच नव्हती. रूळ बदलणे म्हणजे स्थानांतर हे निश्चित असल्यामुळेच मी माझ्या बद्लीबद्दल बोललो होतो.

स्वप्न क्रमांक ८ –

मी मुंबईला कामावर रुजू झालो. तेथील मित्राबरोबर त्याच्याच खोलीवर राहिलो. तेथे एक दुसरे मित्र श्री. कांबळे भेटले. आम्ही तिघे एकाच घरात राहत होतो. पुढे श्री. कांबळे यांना क्वार्टर मिळाले. ते तिकडे राहायला गेले. एकदा त्यांचे मेव्हणे जे डॉक्टर आहेत, ते त्यांच्याकडे आले. ओघाओघानी त्यांनी मी स्वप्नाचा अर्थ सांगतो वैगरे गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. त्यांचा स्वप्नावर विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी डॉक्टर व कांबळे माझ्या खोलीवर आले. डॉक्टरांनी आपण स्वप्नात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकत होतो, एवढेच सांगितले. मी डॉक्टरांना म्हणालो, “आज तुम्हाला थोडासा फटकारा बसेल हे निश्चित. आपण सायंकाळी भेटूच.” मी नंतर ऑफिसला गेलो. सायंकाळी घरी ७ वाजता आलो. साडेसातला डॉक्टर पण आले. आल्याबरोबर त्यांनी “डोईफोडे, मी साडेदहा रुपयात हा ट्रान्झिस्टर घेतून आलो आहे. हि रसीद बघा.” असे म्हणून त्यांनी रसीद मजजवळ दिली. रसीद रेल्वेच्या दंडाची होती. डॉक्टरांनी आपण व्ही.टी. स्टेशनवर मेनगेटने तिकीट काढण्याकरिता जात असतानाच त्यांना टी.टी.आय.नी ‘हा गुन्हा आहे, साडेदहा रुपये भरून रसीद घेतली व लोकलचे तिकीट काढून ते कॉटनग्रीनला परतले.

विश्लेषण :- यात ट्रान्झिस्टर कानाला लावून गाणे ऐकणे हाच भाग सूचक आहे. याचा अर्थ फुटकळ फटका बसणे असा होतो. म्हणजे प्रकरण फक्त साडेदहा रुपयांवरच निभावले एवढेच.

स्वप्न क्रमांक ९ –

हेच डॉक्टर दुसरे दिवशी सकाळी माझ्या खोलीवर आले. माझी परीक्षा घेण्याचा त्यांचा हेतू होता. पण कालचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी त्यांना दोन महिन्यापूर्वी पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांचा मित्र आपल्या बायको बरोबर फिरावयास चालला होता. इतक्यात एक साप पाठीमागून येऊन त्या बाईच्या गळ्याला चावला. इतक्यात त्यांना जाग आली. वेळ त्यांच्या लक्षात नव्हती. मी थोडा वेळ विचार करीत बसलो. नंतर डॉक्टरांना सरळ विचारले, “डॉक्टरसाहेब, हे स्वप्न पडलं त्यावेळी तुमची मंडळी कोठे होती? माहेरी का सासरी?” डॉक्टरांनी त्यांची पत्नी त्यांच्या घरीच होती असे सांगताच मी सरळ सांगितलं, “मंडळीस दिवस असलेच पाहिजेत अन् असतील तर तुम्हास मुलगाच होणार.” डॉक्टरांनी मंडळी गरोदर असल्याची कबुली दिली. त्यांना मुलगाच झाला असे त्यांनी पत्राने नंतर कळवले.

विश्लेषण :- यात स्त्रीला साप चावतो हा एकच भाग सूचक आहे. सर्वसामान्यतः स्त्रीला साप चावल्यास व ती गरोदर असल्यास हमखास भारतीय स्वप्न्फलाप्रमाणे शंभर टक्के मुलगाच होतो. डॉक्टरांचा व माझा अल्प परिचय होता त्यामुळे मला त्यांना मंडळी गरोदर आहे का हे विचारावे लागले. कारण साप फक्त त्या स्त्रीस चावला होता.

स्वप्न क्रमांक १० –

माझ्या एका मित्राच्या मुलाला रेसचे घोडे पळताना दिसले. इतकेच नव्हे तर ज्या क्रमांकांनी ते आले होते ते सर्व क्रमांक दिसले. जाग येताच त्यांनी क्रमांकांनी आलेले घोडे लिहून ठेवले व आपल्या वडिलांस सांगितले. त्याचे वडील नेमके सिनेमाच्या नादात विसरून गेले. दुसरे दिवशी सकाळीच माझ्याकडे आले आणि मुलाचे स्वप्न आणि घोड्याचे क्रमांक सांगितले. सुदैवाने मजजवळ महाराष्ट्र टाईम्स होताच. मी त्यांना घोड्याच्या क्रमांकावरील भाव दाखविला. त्यावेळी ती रेस तनाला होती. भाव पाच रुपयास रुपये ३,३००/- निघाला होता. त्यांना उशिरा आल्याबद्दल फार पश्चाताप झाला. पण त्यांना नंतर मी ठासून सांगितले घोडा स्वप्नात इतक्या थोड्या रकमेकारिता आलेला नाही. तुमच्या मुलाचा उत्कर्षाचा काळ आला आहे. थोड्याच दिवसात त्यांच्या मुलाला एका कंपनीत नोकरी लागली. अनुभव येत गेला. तो दुसऱ्या कंपनीमध्ये गेला. आज त्याला बरोबर रुपये ३,३००/- पगार आहे.

विश्लेषण :- पहिली गोष्ट स्वप्नात घोडा येणे हे अत्यंत शुभ आहे. घोडा हा प्राणी यशाच्या मार्गावर गतीने जाणार याचे प्रतीक आहे. त्यातून रेसचे घोडे म्हणजे बोलायलाच नको. हे रेसचे घोडे ज्या क्रमांकांनी आले त्या क्रमांकांनी त्या मुलास दिसले. परंतु ते घोडे एका शुल्लक यशाकरता आलेले नव्हते. कारण तसं असतं तर त्याचे वडील रेसवर गेले असते. घोडा आयुष्याची रूपरेखा दाखवतो. अशांचे आयुष्य उत्कर्ष-यश यांनी भरभरून जातं. हे आज त्याच्याकडे बघितलं की पटतं.

स्वप्न क्रमांक ११ –

मी १९५८ साली इंटरच्या परीक्षेकरिता इंदोरला गेलो होतो. माझ्या बरोबर श्री. अरविंद भालेराव(सध्या ते परभणीस एका हायस्कूलचे सहशिक्षक आहेत) होते. एक महिना परीक्षेकरता राहून आम्ही परत परभणीस येऊन आपआपल्या नोकरीवर रुजू झालो. तीन महिन्यांनी निकाल लागत असे. मी हिंगोलीला फिरतीवर गेलो होतो. तेथील मित्रांनी इंटरच निकाल लागल्याचे सांगितले. इंदोरकडील कोणतेच वर्तमानपत्र इकडे येत नसल्याने तेथील हेडमास्तरांनाच(ज्यांच्या माफत आम्ही फॉर्म भरला होता) जबाबी तर करावयाची ठरवले. सकाळी सहाच्या गाडीने परभणीस जावयाचे होते. म्हणून वडिलांस लवकर उठ्वावयास सांगितले. त्या रात्री स्वप्नात श्री. अरविंद भालेराव मला म्हणत होता, “काका, तुम्ही पास झालात. ही बघा पास झाल्याची तर आली आहे.” असं म्हणून त्यांनी मला तार दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावर मी त्याला म्हणालो, “अरे तार काय दाखवतोयस. तार नापास झाल्याची सुद्धा येते.” त्यावर तो खो-खो हसत म्हणाला, “काका, तुम्ही फारच विनोदी आहात बुवा.” याच वेळी मला जाग आली. घड्याळात बरोबर पाच वाजले होते. नंतर मी वडिलास म्हणालो, “मी पासच झालो आहे. काळजी करू नका.” मी परभणीस येताच इंदोरला तर केली आणि दुसरेच दिवशी पास झाल्याचे उत्तर आले.

विश्लेषण :- परीक्षेस आम्ही दोघेही बसलो होतो. ही वास्तविकता. परंतु अरविंद मला तार दाखवून पास झाल्याचे सांगतो व तो हसतो आहे. येथे दुसऱ्यांनी पास झाल्याचे सांगणे हे सूचक असून दुसऱ्याच्या हसण्यामुळे आनंददायी घटना घडणारच म्हणून पासची खात्री. शिवाय स्वप्न, स्वप्नाच्या भाषेत, सकाळचेच आहे.

स्वप्न क्रमांक १२ –

माझे एक जिव्हाळ्याचे मित्र मुंबईस नोकरीस होते. त्यांची मुलंबाळ नागपूरलाच राहात होती. एक वेळ ते दोन महिन्याची रजा काढून आले. अधूनमधून त्यांचे आमचे घर व आमचे त्यांचे घरी जाने येणे असे. एक वेळ मी सात वाजता सकाळी फिरत फिरत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला रात्री पडलेले स्वप्न सांगितले. स्वप्नात त्यांना अगोदर हिरवी झाडे दिसली. नंतर पर्वत वैगरे आणि शेवटी एका झाडास लागलेले जोड्फळ दिसले. इतक्यात त्यांना जाग आली. त्यावेळी पाच वाजले होते. मी पाच मिनिटे अगदी सुन्न झालो. जड अंतःकरणाने मी त्यांना स्पष्ट सांगितले की, आज तुमचा दिवस अत्यंत वाईट जाणार आहे. अपमानाची किमान मर्यादा असणारी घटना घडेल. तेव्हा धीराने वागा. एवढे सांगून मी घरी आलो. नंतर ऑफिसला गेलो. ऑफिस सुटल्यावर मी सरळ त्यांचे घरी गेलो. ते घरीच होते. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सांगितले, “तुम्ही गेलात आणि मी पण सुन्न होऊन गेलो. कसेबसे स्नान करून पूजा उरकून बसलो. वाचण्यात मन लागेना. दहा वाजले आणि दारात सावकार बेलीफला, इतर चौघा भाडोत्री साक्षीदारांना घेऊन हजार झाला. मी धीराने सर्वांना आत बोलावले. बेलीफनी कोर्टाची डीक्त्रीची ऑर्डर दाखवली. आपण आतले आतच सर्व कागदपत्री व्यवहार उरकून घेऊ म्हणजे तुमची अब्रू वाचेल व माझेही काम होईल. यावर मी त्यास माझ्या पगारातून डीक्त्रीप्रमाणे देणे वजा होत आहे. याचा पुरावा म्हणून मी ओफिसकडून आलेल्या मनीऑर्डरचे कुपन दाखवले. त्यात वजावटीचा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे बेलीफ गोंधळात पडला. एव्हाना भाडोत्री साक्षीदार निघून गेले. बेलीफनी मला कोर्टातून स्टे ऑर्डर आणण्यास सांगितले. मी ताबडतोब कोर्टात गेलो. मॅजिस्ट्रेट पुढे सविस्तर लिहून अर्जासोबत मनीऑर्डरचा खालचा भाग जोडला. मॅजिस्ट्रेटनी ताबडतोब स्टे दिला आणि स्वतःच घेऊन जाण्यास सांगितले. दहा मिनिटात स्टे घेऊन घरी आलो. स्टे बेलीफला दाखवला. थोडे उत्पन्न बुडाले म्हणून तो चडफडत परत गेला. अशा रीतीने आमची अब्रू आज जाता जाता वाचली. अजून काही राहिलं का?” असं म्हणून त्यांनी अत्यंत केविलवाण्या दशेन माझ्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यातील तरळणाऱ्या पाण्याकडे पाहून तो पण गहिवरला. मी शांतपणे म्हणालो, “पहिला अटळ अध्याय संपला. आता दुसरा आनंददायक अध्याय आठ दिवसांनी सुरु होईल. मी आठ दिवसांनी येईन.” असं म्हणून मी घरी आलो. बरोबर सहा दिवसांनी ते माझ्या घरी प्रमोशनची तार घेऊनच आले. त्यावेळी आमच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. पण ते कसले होते हे आम्हा दोघांनाच माहीत होतं.

विश्लेषण :- या स्वप्नात हिरवीगार झाडे आणि जोड्फळ(दोन अलग अलग नव्हे) एवढीच सूचक आहेत. जोड्फळ दिसणे म्हणजे अति अपमानास्पद घटना घडणार याचे द्योतक. त्यामुळे तो दिवस अशुभमध्ये अगोदर घेतला आणि हिरवीगार झाडे हि आयुष्यात “हिरवळ” आणणार याच द्योतक. दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला आहेच.

स्वप्न क्रमांक १३ –

माझ्या एका मित्राची बहिण एम.एस.सी. ला होती. परीक्षा होऊन गेली. ती गावाला जाण्यापूर्वी तिला एक स्वप्न पडले. त्यात तिला एक हाती सोंडेत माळ घेऊन फिरताना दिसला. त्यांनी ती माळ तिच्या गळ्यात घातली नाही. तो ती माळ नुसती फिरवतच निघून गेला. त्या मुलीनी मला अगोदरच सुचना दिली की स्वप्नाचा वाईट अर्थ असेल तर सांगायची आवश्यकता नाही. मी तिला स्वप्नाचा अर्थ चांगला असल्याचे सांगितले. स्पष्टीकरण करून मी तिला “हायर सेकंड” क्लास पास होशील पण फर्स्ट क्लास मिळणार नाही असे सांगितले. यथाकाश निकाल लागला आणि ती ५९ गुणांनी पास झाली. अर्थात सेकंड क्लासच.

विश्लेषण :- हत्ती दिसणे – यशाचे लक्षण, माळ गळ्यात न घालणे म्हणजे हर घालण्यैटका गौरव न होणे. म्हणजे प्रथम श्रेणी न मिळणे हा होय. विद्यार्थिनी असल्यामुळे स्वप्न निकालापुरतेच मर्यादित राहील.

स्वप्न क्रमांक १४ –

मी १९६२ साली औरंगाबादेहून नागपूरला बदलून आलो. माझे परम मित्र श्री. खंडेराव शेवाळकर यांनी निरोप दिला. आता भेटी क्वचितच होतील याची खंत पण व्यक्त केली. माझ्या १२ वर्षाच्या मुलीला ब्रेन ट्युमर झाला होता. त्यामुळे तिची दृष्टी गेली होती. अंधविद्यालयात शिक्षण घेता यावे म्हणून मी नागपूरला बदली मागून घेतली होती. दोन वर्षांनी कॅन्सरच्या गाठीची परत वाढ झाली. हाल हाल झाले आणि तिने १९६६ साली आपली जीवनयात्रा संपविली. माझी बदली नंतर १९६९ साली मुंबईत झाली. १९७२ पर्यंत माझी मुलगी माझ्या स्वप्नात कधीच नाही आली. मुंबईत मी कॉटनग्रीनमध्ये हौसिंग बोर्डाच्या इमारतीत मित्राबरोबर राहत होतो. एकदा कधी नव्हे ती माझी मुलगी (भूत) माझ्या स्वप्नात आली. तिने लाल कपडे घातले होते. तिच्या मागे माझे मित्र खंडेराव शेवाळकर उत्तम कपड्यात दिसले व मला जाग आली. त्यावेळी सकाळचे पाच वाजले होते. मी व माझा मित्र सकाळी ६ वाजता चहा पिण्यास हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी मी माझ्या मित्रास म्हणालो की, “आज माझे परम मित्र शेवाळकर यांचे पत्र येईलच. कारण माझ्या मुलीच्या मागे ते मला स्वप्नात दिसले.” सायंकाळी ऑफिस सुटल्यावर आम्ही दोघे बरोबरच घरी परतलो. दरवाजा उघडताच समोर आंतरदेशीय पत्र दिसले. पत्र श्री. खंडेराव शेवाळकर यांचेच होते. पत्र वाचून मी खालीच बसलो. “आपण गाडीवर यावे. माझ्याबरोबर माझे भाचे आहेत. अकोल्यास गेलो असताना डॉ. लक्ष्मणराव भोगते, सिव्हिल सर्जन, यांनी तपासले. त्यांनी कॅन्सरचे निदान केले आहे.” माझ्या मुलीच्या मागे शेवाळकर दिसले आणि त्यांना पण कॅन्सर होणे हा विलक्षण योगायोग वाटला.

विश्लेषण :- माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता. ही वास्तवता होती. ती कधीच स्वप्नात आली नव्हती म्हणून सूचक काहीच न बोलता उभी राहिली होती. व तिच्या मागे श्री. खंडेराव शेवाळकर उभे होते. म्हणजे तिच्या मागोमाग त्याच आजाराने जाणे निश्चित होते. आजारातील साम्याच विलाक्षण.

स्वप्न क्रमांक १५ –

श्री. पांडे यांचे फेस रीडिंग यावर पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे, असे कळताच पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल व वितरणासंबंधी चौकशी करावयास म्हणून त्यांच्या कार्यालयात गेलो. ते तेथे नव्हते म्हणून बाहेर फिरत होतो. तोच “अहो डोईफोडे, इकडे कोणीकडे,” म्हणून मला बोलावले. ते होते श्री. रमेश नवलाखे, उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर. त्यांनी कार्यालयातच नेले. त्यांनी मला २६ वर्षानंतर देखील ओळखले होते याचा मला खरोखरच आनंद झाला. त्यांनी ताबडतोब १९६३ सालची आठवण सांगितली. ती त्यांच्याच भाषेत देत आहे.

“१९६३ साली मी विक्रीकर खात्यात आपल्या हाताखाली लिपिक म्हणून होतो. त्यावेळी मी आपणास एक स्वप्न सांगितले होते. ते मला अजूनही आठवते व त्यावर आपण सांगितलेले भविष्य पण. ते स्वप्न असे.

जानेवारी १९६३ च्या उत्तरार्धात सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान हे स्वप्न पडले. प्रचंड असा पाण्याचा सागर एका देवळाभोवती पसरला होता. देवळात मी पूजा करीत होतो. सोबत दर्शनार्थी पुष्कळच होते. सायरनसारखा आवाज आला आणि सर्वांनी बाहेर जावे अशी हाकाटी पिटली. पाणी आत येऊ लागले. माझी पावलं त्यात रोवली जाऊ लागली. ती बाहेर निघणे कठीण असे वाटू लागले. अशा वेळी परमेश्वराचा धावा केला. एक अशी प्रचंड लाट आली. मी चालू लागलो. मी जसजसा पाण्यातून चालू लागलो तसातशी पाण्यात पाउलवाट मोकळी होऊ लागली होती. मी त्या मोकळ्या होऊ लागलेल्या वाटेने झपाट्याने चालत होतो. शेवटी मी एकदाचा किनारा गाठला आणि मागे वळून पाहिले तर संपूर्ण देऊळ जलमय झाले अन् मला जाग आली. याचा अर्थ आपण सांगितला तो असा-

“नवलाखे, तुम्ही लिपिक म्हणून येथे कायमचे राहणार नाहीत. तुम्ही ही नोकरी सोडाल. येथून तुमच्या प्रगतीची वाट मोकळी झाली आहे. सतत उत्कर्ष होईल एवढाच अर्थ आहे.”

आज मी उपसंचालक पदावर आहे पण ते स्वप्न आणि तुम्ही केलेले भाकीत मी आजही विसरू शकलो नाही.” चहा घेऊन मी बाहेर आलो तो श्री. नवलाखे यांच्या विलक्षण स्मरणशक्तीचा प्रत्यय घेऊन.

ज्या स्वप्नाचे मी त्यावेळी तेथल्या तेथे मनात विश्लेषण केले ते असे – देवळात दर्शनास जाणे ही सात्विक प्रवृत्ती. पाण्याची प्रचंड लाट येणे हे तसे संकट पण येथे ते ज्या पदावर होते तेच संकट होते. पण त्या लाटेनंतर पाण्यात पाउलवाट तयार होऊन पैलतीरी जाने हेच सूचक होते. सर्व जलमग्न होणे याचा अर्थ मागील परिस्थिती लय पावणे आणि पाउलवाट मोकळी होऊन किनारा गाठणे हे प्रगतीपर पावलं पडणं हाच होता. म्हणून मी प्रगती व सतत उत्कर्ष होईल हे निर्धास्तपणे सांगू शकलो.


1 Comment

स्वप्नदृश्य व स्वप्न्फल

आतापर्यंत आपण डॉ. सिगमंड फ्राईडचा सिद्धांत मान्य करूनही, त्याला डावलून पूर्वीपासून प्रस्थापित झालेल्या प्रतीकाचे परिणाम बघू शकलो. इजिप्शियन वाङ्मयात स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं सर्वप्रथम आली आहेत. स्वप्नात दिसणाऱ्या सर्व वस्तूंची भाकीतं हि कोणा एका व्यक्तीची स्वप्ने नव्हेत. तर पुन्हापुन्हा पडणारी सारखी स्वप्ने आणि त्यांचे सारखे परिणाम हे लक्षात आल्यावर त्याची नोंद घेण्याची पद्धत सुरु झाली आणि आज त्याचा कोश इंग्रजीत तसाच इतर भाषांतही तयार झाला आहे. मराठीत तशाच प्रकारची डिक्शनरी तयार करण्याचे प्रयत्न होत आहे. स्वप्न या विषयावर एका रशियन भाषेत चाळीस हजार स्वप्नांचा संग्रह केला आहे.

या भागात स्वप्नदृश्य आणि त्याचे फल दिले आहे. वास्तविक स्वप्न्दृष्याचे फल पाहण्याची फार थोडी गरज लागते. एक वेळ तुम्हास स्वप्नाचे विश्लेषण करून त्यावर थोडे चिंतन, मनन करता आले तर डिक्शनरी न बघताही तुम्ही पुढे काय होऊ शकतं हे काही दिवसाच्या सरावाने सहज अचूक समजू शकता. कारण स्वप्न हि सर्वस्वी एका व्यक्तीचीच बाब आहे. तीच व्यक्ति जास्त अधिकाराने स्वप्नफल समजू शकते. इतरांच्या स्वप्नात डोकाव्ण्याकर्ता ते स्वप्न पडणाऱ्याचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करूनच त्याचे फळ काढण्याचा प्रयत्न अभ्यासाशिवाय जरा कठीण. तेव्हा अगोदर आपल्या स्वप्नाचेच विश्लेषण करून किती टक्के यश मिळतं ते पाहा.

यातील दृष्यावस्तू या फक्त मार्ग दाखवणाऱ्या किंवा असं म्हणू की सूचनेच्या पाट्या आहेत. खालील प्रत्येक वस्तू किंवा दृश्य हे त्या त्या व्यक्तीची उन्नती-अवनती, पदोन्नती, पदावनती याचे द्योतक आहे. व्यापारी वर्गास जर “भर-भराट” होईल तर त्याच किंवा तशाच स्वप्नास सरकारी नोकरास पदोन्नती मिळेल, अशा रीतीने हि स्वप्न्फलं आहेत. वाचकांनी ताडून पाहावीत. अधोरेखित स्वप्नदृश्य आणि स्वप्नफल हि सर्वसामान्यांच्या अनुभवास आलेली आहेत. म्हणून याची फलं शंभर टक्के तीच आहेत यात शंका नसावी. यात खोगीरभरती करण्याचे टाळले आहे.

कोणा एका मराठी छांदिष्टाने थोर मोठ्यांच्या आयुष्यातील स्वप्ने गोळा केली तर स्वप्नदृश्य आणि स्वप्न्फलास निश्चितच पुष्टी मिळेल. मला उगीचच राहून राहून वाटलं की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. शरद पवार यांना पहिल्या प्रथम मुख्यमंत्री होण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच माजी मुख्यमंत्री श्री. अंतुले यांना पण पायउतार होण्यापूर्वी निश्चितच तसे सूचक स्वप्न पडले असेलच. तसेच विद्वान व तरुणात लोकप्रिय असलेले माजी मंत्री श्री. जिचकार यांना पण मंत्री होण्यापूर्वी आणि मंत्रिपद जाण्यापूर्वी निश्चितच काहीतरी सुचना स्वप्नामार्फत मिळाली असेलच. स्वयंस्फूर्तपणे मोठ्या माणसांनी आपले अनुभव कळवल्यास या शास्त्रास हातभार लावण्याचे श्रेय मिळेल. तेव्हा सर्वांना विनंती करावीशी वाटते की त्यांनी या छंदास प्रोत्साहन देऊन यातील स्वप्नफल आणि स्वप्नदृश्य यास बळकटी येईल असे अनुभव कळवावेत.

स्वप्नदृश्य

स्वप्नफल

अग्नीवर वस्तू शिजवने, अग्नी, अग्नी पेटवलेला पाहणे उद्योगधंद्यात लाभ, सर्व काळजी दूर होणे.
 अंडी खाणे  त्रास नाहीसा होणे, आनंददायक घटना घडणे.
 अंधारकोठडी पाहणे, अंधारी रात्र पाहणे,  चैन जन आपत्ती येणे, विपन्न अवस्था प्राप्त होणे.
 अश्व (घोडा)  अत्यंत शुभदायक. आर्थिक स्थैर्य, भरभराट आणि उन्नती निश्चित. नोकरी करणार्यास पदोन्नती.
 अन्न दर्शन – अन्नदान  कार्यसिध्दी
 आग लागणे, आगीचा डोंब  लक्ष्मीचा वरदहस्त, मोठा सांपत्तिक लाभ.
 आकाश, आकाशात उडणे सुखकारक, वैभव वाढ, आजारातून मुक्तता.
आकाशातून पडणे संपत्ती नाश, संकट येणे.
आंगठी विकणे स्त्री विरह-दुःख
आड खोडणे  सुरु केलेले काम पूर्ण होणे.
आंघोळ करणे दुःख नाहीसे होणे.
आरसा चांगले मित्र मिळणे – उर्जित अवस्थेकडे वाटचाल.
आरसा फुटणे नातेवाईकाचा मृत्यू
आंब्याचे झाड, पिकलेले आंबे, आंबा खाणे धनार्जक, वैभवाकडे निश्चित वाटचाल
आई-वडील सुखकारक, भाग्यवर्धक
आंबट पदार्थ खाणे अपाय-धोका
आंधळा आजारीपण
आगबोटीत बसणे, जलपर्यटन, आगबोट स्वतः चालवणे शुभकारक, धंद्यात भरभराट, उन्नती
आरशात प्रतिबिंब दिसणे, पाहणे प्रेमभंग-तोंडाला काळिमा लागणाऱ्या गोष्टी घडणे.
इस्त्री करणे नोकरीत बढती, अविवाहितांचे विवाह.
उंदीर दिसणे भांडणे, मानसिक त्रास
उंट, उंटावर बसणे, फिरणे अडचणी, विवंचना, अपमान आजार उद्भवणे.
उवा शरीरास आजार
कोळसा संधी गमावणे किंवा संधी मिळून देखील यश न येणे.
कावळा दुःख, दुर्दैव, भांडणे
कावळा डोक्यावर बसलेला ज्याच्या डोक्यावर बसला असेल त्याचा मृत्यू, सामान्यतः सात वर्षात निश्चित. स्वप्न वेळ काढल्यास त्या प्रमाणे.
ओढा शुभ फलदायक
ओकारी शुभ फलदायक
ओटीत नारळ घालणे कल्याण, शुभविवाह, पुत्र प्राप्ती
कपिला गाय ज्ञान प्राप्ती, काळ्या रंगाची गाय दिसल्यास मंगलकार्य होणारच.
कोळी, कोळ्यांनी जाळे विणणे धनसंग्रह – सुखोपभोग
कबुतर संकटाची पूर्वसूचना
कोकिळा भरभराट
किडा, किडे अंगावर बसणे भाग्योदय, उर्जितावस्था
केस गळणे-कापणे सुबत्ता निघून जाने, मानहानी, विपन्नावस्थेकडे वाटचाल.
कमळ सुख समाधान, भाग्यवर्धक
कापूस अत्यंत अनिष्ट फळदायक, हातून अशा चुका होतील कि ज्यामुळे मानसिक अवस्था पूर्णपणे नष्ट होईल.मानखंडणा आपोआप आलीच.
काळा रंग, काळे रंग, काळे वस्त्र हा रंग अनिष्टकारक आहे हे सर्वांनाच माहित आहे.
करवंटी रसातळात जाणे
केळी, केळ कार्यसिद्धी
केरसुणी, केरसुणीने केर काढणे-झाडणे त्रासदायक घटना घडून बेकार खर्च होणे.
कोणी रडलेले बघणे शुभ समाचार समजणे
केस घेणे देता देता मृत्यू
कापलेला हात दुःख येऊन त्यातून मुक्तता
कोणी सिंहासनावर बसलेला पाहणे कोणतेही काम पूर्ण होणे
कोणाबरोबर भांडणतंटा ख़ुशी व सौख्य
कोणी वैद्य – डॉक्टर पाहणे भारी दुःख यातना
कुत्रा दिसणे शत्रुत्व, विरोध होणे
कुत्र्यास ठार मारणे व्यवसायात भरभराट होणे
केशरी रंगाच्या वस्तू पाहणे शुभकर्मे – कुटुंब वृद्धी
खटाऱ्यात बसणे शुभफलदायक-धनलाभ
खारट पदार्थ खाणे महत्त्वाचे कार्यात सुयश
ख्रिसमस, ख्रिस्त, ख्रिश्चन पाहणे उत्तम मित्र मिळणे, शक्तिशाली संरक्षण, दया, परोपकार यांची वाढ होणे.
खणणे सत्ता, लॉटरी, गुप्तधन मिळण्याचा योग
खोल विहीर पाहणे चिंता प्राप्ती, घसरण सुरु होणे
खाली उतरणे अपकार्य, परागती, अधःपतन
गाईने हल्ला करणे धंद्यात हानी
गरुड, गरुडझप आकांशा वाढणे, फलदायक कीर्ती
गंधाचा लेप लावणे उत्पन्नात वाढ होणे.
गाणे पाहणे, ऐकणे तंटा, मन-स्वास्थ्य बिघडणे, फटका
गहू दिसणे उत्कर्ष, भरभराट
गाण्याची मैफिल झडणे कार्यसिद्धी लांबणीवर पडणे
गाय पाहणे, त्यातल्या त्यात काळी अत्यंत शुभ. लग्नकार्य होणार हे निश्चित
गाढव दिसणे बेअब्रू, कष्टप्रद यातना
गाढव ओरडणे फायदा होणे
ग्रह निखळून पडणे घोर शोक, मृत्यू
गुलाब फुल सुखसमृद्धी
ग्रहण दिसणे अडचणी दूर होणे
गढूळ पाणी दिसणे आर्थिक अडचणी येणे
ग्रंथ दिसणे ज्ञानात वाढ होणे
ग्रंथ वाचणे अंदाज चुकणे
घोडा, घोड्यावर बसणे, चढणे, पांढरा काळा, नटलेला, रेसचा वेगानी धावणारा कुटुंब वृद्धी, राजमान्यता, मान-सन्मान, भरभराट, सतत उत्कर्ष, रोगमुक्तता, उन्नती निश्चितच
घोड्यावरून पडणे वैभावनाश, पश्चाताप
घर दिसणे उन्नती होणे
चर्च, चर्चची घंटा वाजणे शुभ वार्ता, जिव्हाळ्याचे वातावरण
चंद्रास्त, चंद्र निस्तेज दिसणे घोर शोक, मृत्यूयोग
चंद्र ग्रहण, चंद्र दिसणे सर्व क्षेत्रात सुयश. संकटातून मुक्तता, आजारातून बरे होणे, समाधानाचा काळ
चंद्र ढगाने व्यापणे, अंधुक दिसणे प्रकृती बिघडणे, प्रेमाचा बाबतीत विघ्न येणे
चाकू दिसणे मित्राबरोबर खटके
चेंडू दिसणे खोटा आरोप येणे
चपला(जुन्या) दिसणे अडचणी – मनोभंग
चपला(नव्या) दिसणे उत्तम दिवस
चांदी दिसणे, गोळा करणे सौख्यावर्धक, चैन
चिलीम पिणे, ओढणे धनवान होणे.
छत्री उघडून चालणे, डोक्यावर धरणे अशक्य कार्य तडीस जाणे, मानमरातब व ऐश्वर्यवाढ, आरोग्य, धनवाढ.
जोड(जुना-फाटका) अडचणी उत्पन्न होणे.
जिना चढून जाणे कौटुंबिक उत्कर्ष, प्रगती, उन्नती
जिना उतरणे घसरण सुरु होणे
जेवणावळी दिसणे संकटे, चिंता, आर्थिक अडचणी
जेवण करणे किरकोळ आजार येणे
जमिनीवर बिछाना अंथरणे आरोग्य प्राप्त होणे, आर्थिक प्रगतीकडे वाटचाल
जंगल(हिरवे) दिसणे आनंदाचे क्षण येणे, शोक दूर होणे
जांभूळ दिसणे-खाणे सर्व त्रासातून मुक्तता
जळता दिवा सुकलेला बाग समृद्ध होणे, पुत्रसंतती होणे.
जननेन्द्रिय दिसणे मनकामना पूर्ती, भरभराट
पुरुषाचे जननेन्द्रिय वाजवीपेक्षा मोठे दिसणे आर्थिक अडचणीतून निश्चित मुक्तता
जलविहार, जलक्रीडा ध्येयप्राप्ती, प्रगती
झाड समृद्धीकारक
झाडावर चढणे रोगमुक्त होणे, अभ्युदय्कारक
झाड तोडणे नुकसानीस तोंड द्यावे लागणे
झेंडा (पांढरा) प्रसन्नता प्राप्ती
झेंडा (हिरवा) समोर कठीण प्रसंग येणे
झेंडा (लाल) आराम नाहीसा होणे
टेकडीवर चढून जाणे परीक्षेत यश, उज्ज्वल पराक्रम, धाडशी कार्यात यश
टांगा स्वतः हाकणे, प्रवास अनुकूल वातावरण
टोपी(घाणेरडी) इतरांच्या डोक्यावर किंवा स्वतःच्या डोक्यावर पाहणे संपूर्ण जीवन उन्नती, सरकारी नोकरास पदोन्नती निश्चित, इतरास अत्यंत भरभराटीचे दिवस. मानमरातब मिळणारच.
टोपी दुसऱ्याने डोक्यावर आणून ठेवणे अनर्थ, फसवणूक
डाकघर राहत्या जागेत बदल
डोळ्यात अंजन घालणे, सुरमा, काजळ मृत्यूकडे वाटचाल
डोंगरावर चढणे, फिरणे नोकरीत मोठी जागा मिळणे, दिवस भरभराटीचे येणे
ढगाळ आकाश, ढग दिसणे दुर्दैव सूचक, संकट येणे
तलाव दिसणे, पोहणे, पडणे शुभफलदायी, भरभराट
तलावात उडी मारणे नुकसान, खोटे येणे, धोका
तलावात लाटा व तरंग दिसणे निःसंशय संकटाची सूचना
तेल मर्दन करून घेणे शस्त्रभय, अपघात, आजार
तारे दिसणे संकटातून मुक्तता
तूप पिणे, तूप प्राप्ती दीर्घायुष्य, सर्व कार्यात यश
टाक पिणे, दिसणे, मिळणे नुकसान, अपघात, बेअब्रू
तलवार (नंगी) हाती धरणे शत्रूवर विजय मिळवणे
तोफ पाहणे शत्रुनाश, विजय मिळणे
तंबोरा वाजवणे भरभराट होणे
तुम्ही कोणावर रागावणे सुकलेले मन प्रसन्न होणार्या घटना घडतील
ऑफिस बघणे जिकीर पैदा होणे
देवालय, देवळावर चढणे, देऊळ उत्कर्ष, वैभव
दात पडलेले बघणे अत्यंत वाईट स्वप्न, सर्व पैसा जावून मनुष्य धुवून निघतो.चांगला दिसणारा व असणारा मनुष्य चुकीच्या मार्गाला लागून सर्वनाश ओढवून घेतो.एवढं तरी बरे आहे की यात फक्त पैसाच जातो. स्थावर इस्टेट विकल्या जातात.
 दाढी करणे मानहानी निश्चित होणार
दुध, दुध पिणे, दही मिळणे, पिणे सर्वत्र आनंदी आनंद, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ
दिवा भाग्योदय
दिवा विझणे आयुष्यात अंधार येण्यास सुरुवात
दफनविधी संपत्ती प्राप्ती
धूर दिसणे, धुरात गुदमरणे उपद्रव, नुकसान, मृत्यूची चाहूल
धार्मिक समारंभ महत्वाचा उत्कर्ष
नदी नाला, यात पोहणे शुभ फलदायी
नदीत लाट, तरंग, उडी मारणे, लोंढ्यातून जाणे, भोवरा दिसणे, लाटा अंगावर येणे संकटाची पूर्वसूचना, भांडण, बेबनाव, नुकसान, मानहानीचे प्रसंग येणे
न्हावी दिसणे कर्जबाजारी होणे, अशुभ सूचक
नागदर्शन फना काढून ताठ उभे राहणे, तक लावून पाहणे, मागे धावणे, न चावणे दैवी कोप, कुलदैवत कोप, कामात विघ्न येणे, यश न मिळणे, मनःस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना घडणे
साप चावणे सहसा साप स्वप्नात चावत नाही. पण चावल्यास निःसंशय उत्कर्ष, जय, अमाप पैसा मिळतो. स्थावर इस्टेट होते. मानमरातब, सर्व बाजूनी उत्कर्ष. हेवा करण्याइतकी प्रगती होते.
गरोदर स्त्रीस साप चावल्याचे दिसल्यास मुलगा होतो
मलूल पडून राहिलेला दिसल्यास मुलगी होते
नातेवाईक दिसणे शुभदायक
नारळ ओटीत घालणे, नारळाचा प्रसाद, नुसते नारळ शुभ विवाह, पुत्रप्राप्ती, नशीब उगवते, सर्व कार्यात यश
नारळ फोडणे, फोडलेले पाहणे मानखंडणा होणे, सुखाचे तुकडे होणे, अपघात, कटकटी स्वास्थ्य व मनःस्वास्थ्य बिघडविणाऱ्या घटना घडतात.
न्हाव्यांनी दाढी करणे, हजामत करणे, मर्दन करणे अपघात, खोट, व्याधी, अब्रूचे धिंडवडे निघणे.
पाणी दिसणे, पोहणे, पडणे व स्नान अत्यंत शुभदायी
पाण्याच्या लाटा अंगावर येणे, पाण्यात उडी मारणे, लौंढा, प्रवाह व पाण्यात चालत जाणे अत्यंत अशुभ, नुकसान, भांडण तंटे, नातेवाईकाशी बेबनाव, कलह, कटकटी.
पर्वतावर चढून जाणे प्रगतीचे दिवस येण्याची पूर्वसूचना
पिताजी दिसणे, बोलणे सौख्यकारक
पांढरी फुलं सुख आणि आनंदात भर
पोष्ट ऑफिस राहत्या जागेत भर
पोष्टमन विचित्र घटनेची पूर्वसूचना
पत्र दिसणे, पत्र येऊन पडणे शेजाऱ्याशी भांडण, मित्र व जवळच्या नातेवाईकाशी खटके उडणे.
प्रेत व प्रेतयात्रा दिसणे अडचणीवर मात, लाभास अनुकुलता
पाल मनात गोंधळ निर्माण होणे.
पक्षी दिसणे, गाणे गात असणे सुबत्ता, सर्वोतोपरी सौख्य
पोळी खाणे, पान खाणे, दिसणे आरोग्य, आजारातून बरे होणे
पोळी भाजणे, पाव कापणे, भाजणे दुर्दैव, मनःस्वास्थ्य बिघडणे
पांढरा झेंडा दिसणे गुरुकृपा होईल. प्रसन्नेत भर
पेढे खाणे भरभराट, आनंदत भर
पावा वाजवणे दुःख प्राप्त होणे, क्लेशकारक
फळे, फुले, फळ आलेले झाड, फुले असलेले झाड(जोड्फळ सोडून) यशाचे वाटचाल, वैभवप्राप्ती, इच्चा पूर्ण होणे, समृद्धीत वाढ
फुटका आरसा हलाखीचे दिवस येण्यास प्रारंभ
बंदुकीचा वायबार प्रिय व्यक्तीस, जवळच्या नातेवाईकास जिवावरचा आजार
बंदूक उडविणे त्रासदायक घटना घडणे
बैलावर बसणे शुभफलदायक, परीक्षेत यश
बेडूक दिसणे स्फूर्तीदायक घटना घडणे
भजी खाणे विजय प्राप्ती
भटजी नुकसान, फटका निश्चित बसणार
भांडणात कत्तल होणे अधिकारप्राप्तीचा योग
भडाग्नी दिसणे, ज्वाळा प्रेतास भडाग्नी देणे पराकोटीची उन्नती, आयुष्य बदलून जाणे
भात खाणे बेअब्रू, छी, थू होणार्या घटना घडणे
मीठ पाहणे महत्त्वाच्या कार्यात यश
मांजर ठार मारणे धनवृद्धी, व्यवसायात भरभराट
मार्ग न सापडणे अनिष्ट फलदायक
माता दिसणे उन्नतिकारक – कृपा
आदरणीय स्त्रीशी(मातेसमान) व्यभिचार केल्याचे दिसणे हे स्वप्न अति भयाण असून मनुष्य घाबरून जातो. पण जुन्या शास्त्राप्रमाणे हे अत्यंत शुभ आहे.जे अतिसंकात माणसावर आहे त्यातून निश्चित मुक्तता होते. शिवाय आयुष्यात प्रगतीच होते.
मांस दिसणे, खाणे धनलाभ
मद्यपान करणे आरोग्यास धोका, प्रकृती ढासळणे.
माता दिसणे यश. अमाप पैसा मिळणे.
मासे पकडणे, मारणे फसवे मित्र भेटणे, फसवेगिरी
मोर दिसणे आर्थिक परिस्थितीत खूप सुधारणा
मोटार स्वतः चालविणे प्रतिकूल वातावरणावर मात, प्रगतीकडे वाटचालआयुष्य सरळ सुखी जात राहिल
महारोगी निश्चित अर्थलाभ
मुंगी, मुंगळा दिसणे विपत्ती येणे, यश न मिळणे
मंदिरातील घंटा वाजणे, मूर्ती न दिसणे, हसणे, बोलणे भाग्योदय, उत्कर्षाकडे वाटचाल
मीठ खाणे कार्यात यश मिळणे
मोहरी दिसणे चिंतावाढ
मिरच्या दुर्दैवी घटना
रडलेले पाहणे(स्वतःस)तसेच इतरांनी रडणे आनंदाची वार्ता, पदोन्नती, मनोकामना पूर्ण होणे, प्रगतीकडे वाटचाल
राख दिसणे (पांढरी राखाडी) अत्यंत अशुभ, जवळच्या माणसाचा मृत्यू, नाना तऱ्हेची संकटे येणे, प्रसंगी फौजदारी खटलेसुद्धा चालणे.
रेस, रेसचा घोडा, रेस ग्राउंड  अत्यंत शुभदायक स्वप्न. आनंद, उत्साह याला उधान येईल. यशाने डोळे दिपून जातील. सर्वांगीण उन्नती व उत्कर्ष हे फळ दीर्घकाळ टिकणारे आहे.
रुमाल बांधणे समृद्धी
रत्ने दिसणे, धारण करणे सुखी जीवन जगणार याचे द्योतक ऐश्वर्यवर्धक समृद्धी
लोखंड दिसणे दुर्दैवी घटनेची नांदी, चुकीच्या मार्गास सुरुवात
लहान मुल रडतरडत जवळ येणे आर्थिक स्थैर्य, लाभ
लोणी काढणे, खाणे अचानक धनलाभ
लग्नाची वरात स्त्रीस आनंददायक, पुरुषास वाईट. पश्चाताप होईल अशा चुका हातून घडतील.
लढाईत कत्तल होणे, लढाई अधिकारप्राप्ती, सुखवृद्धी
विहीर दिसणे, पडणे चिंता, विपत्ती यात वाढ होणे.
विस्तव भाग्योदय होणार याची सूचना
विष्ठा, विष्ठा दिसणे, भक्षण करणे धनप्राप्ती, उत्पन्नात लक्षणीय वाढ होणे. हे स्वप्न केवळ आर्थिक लाभाचे आहे.
वांती शुभसूचक, क्षणिक अडचणीवर क्षणात मात.
विमानातून प्रवास करणे कार्यात विघ्न येणे
वाघ दिसणे, वाघाच्या तावडीतून सुटका होणे निर्भयपणा प्रखर होणे, रेस, लॉटरीत यशाचे योग.
वाघ चावणे शुभदायक घटना घडेल
विंचू दिसणे जय – पुत्रपौत्रवृद्धी – सुखात भर
वधू दिसणे, वर दिसणे अशुभ, कार्यात अपयश
दिवा विझणे आजार, अडचणीस सुरुवात, कटकटी
वानर, वानराचे पिल्लू शत्रुत्व, अपमानास्पद घटना घडणे. अपमानाची खिरापत
शिवलिंग दिसणे महत्त्वाचा उत्कर्ष, सुखी काळाकडे वाटचाल
शिडीवर चढणे निश्चित प्रगती. ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात प्रगती
शिडीवरून घसरणे आयुष्यात घसरणीला सुरुवात. हळूहळू सर्वस्वी पडेल
शर्यतीचा घोडा जीवनाच्या शर्यतीत हमखास यश
शौचास जाणे, शौच दिसणे, शौच करणे या स्वप्नाची वेळ काढल्यास तेवढ्या काळात निश्चित धनलाभ
समुद्र, सागर पाहणे, पोहणे, स्नान करणे, भरती आयुष्यात सुखाला भरती येणे
समुद्राची ओहटी सुखास ओहटी लागणे
सूर्यास्त, सुर्यपतन मृत्यूची चाहूल
सूर्योदय, सूर्यग्रहण, सूर्य व सोने दिसणे ज्ञानवृद्धी, एखाद्या विषयात विलक्षण प्रगती, धनलाभ
सासू-सासरा दिसणे संकटात वाढ
सिगरेट ओढणे योजना पूर्ण होतील. व्यापार्यास धंद्यात निश्चित लाभ होईल.
सुपारी कामात यश मिळणे कठीण
स्त्रीने जननेंद्रिय पाहणे मनकामना पूर्ण होणे. जे कार्य घेतले आहे त्यात १००% यश
स्कूटरवर बसणे, चालवणे, प्रवास करणे दूरचा प्रवास घडणे, आनंदात भर पडणे
हवेत उडणे आजारातून निश्चित बरे होणे, उशिरा का होईना, प्रगतीकडे वाट.
हत्ती दिसणे कार्यसिद्धी, मित्राचे सहकार्य लाभेल, अकल्पित यश
हागणे पैसा कमी न पडणे. आर्थिक स्थैर्य
हंस सुदैवास सुरुवात, दुर्वैवाचा अंत

काही अनुभवांचे स्वप्नफल

धुराचे इंजिन धुराचे लोट सोडीत अंगावर येणे अत्यंत मानहानीचे प्रसंग येणे, बदनामी होणे, उपहासाचा विषय होणे.
रेल्वेने प्रवास करीत असताना रूळ बदललेले पाहणे स्थानांतर – बदली निश्चित

टीप :- पुष्कळ वेळा स्वप्नात येणाऱ्या व्यक्तींची पुनरावृत्ती होते. तीच व्यक्ती येते आणि पहिल्यांदा ती व्यक्ती आल्यानंतर जो परिणाम होतो तोच ती दुसऱ्यांदा होतो. असे होतच राहते कारण ती व्यक्ती ती सूचना देण्याकरताच येते.

मला एका पटत एकाने लिहिले आहे “माझे वडील माझ्या स्वप्नात आले कि हमखास वाईट घटना घडते. वडील तिसऱ्यांदा स्वप्नात आले आणि माझी धाकटी मुलगी आठ दिवसात वारली. बहुदा माझे वडील वाईट घटना घडणार हे सुचविण्यास येत असावेत. आपण यावर असे का होते ते कळवावे.”

त्यांना उत्तर देऊन मी माझा तसाच अनुभव सांगितला. माझे मामा, मामाकडील वाडा, मामाच्या गावातील माझे मित्र हे माझ्या स्वप्नात आले की, आज कोणाशीतरी भांडण होणार, फटका बसणार, मनाचा तोल जाईल, अशा घटना घडतातच. येथे मामाचे स्वप्नात येणे हे दुर्दैवी घटना घडण्याचे आणि मनःस्वास्थ्य बिघडण्याचे प्रसंग येणार याची पूर्वसूचनाच आहे. तेव्हा शांतपणे अटळ गोष्टी सहन करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?

वाचकांनी अशा स्वप्नांची नोंद ठेवावी.

स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात

१. स्वप्ने ही स्वेच्छेने कधीही पडत नसतात. तेव्हा त्याची कारणे शोधण्याचा विनाकारण प्रयत्न पारू नका. शोधावायाचेच असेल तर त्यातील दृश्य का दिसले याचा शोध घ्या.

२. स्वप्नाचा इष्ट वा अनिष्ट परिणाम हा अटळ असतो याची नोंद घ्या व तो टाळण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. कारण निसर्ग आपल्या सूचना मानवाच्या दानानी किंवा देऊ केलेल्या मानानी(अर्थात मानभावी) बदलत नसतो.

३. डॉ. फ्राईडनी “स्वप्नात फक्त भूतकाळात दडवून  किंवा दाबून टाकलेल्या लैंगिक वासनांची भुते हि असतातच त्यात भविष्य नसतातच” असं अर्धवट सांगितलं आहे हे लक्षात घ्या. स्वप्नात भुते हि वेषांतर करून येतात तशी भविष्यकाळात घडणाऱ्या घटना सांगणारे दुतही येतात अर्थात वेषांतर करूनच.

४. नाटक बघत असताना आपण कोणत्या नटाने वेषांतर करून कोणते पात्र रंगवले हे जसे ओळखतो तसेच स्वप्नांतील वेषांतर ओळखता येते.

५. निसर्गाजवळ क्षमा नाही हे पूर्णपणे लक्षात ठेऊन सर्व प्रसंगास सामोरे जा. निसर्गाच्या सूचना डावलताच येत नाही म्हणून ही सूचना.

६. वाईट स्वप्नाची भीती बाळगू नका. कारण स्वप्नात वाईट नसतं. असतो तो परिणाम. भ्रामक कल्पनांना बळी पडू नका. तर्कशास्त्राच्या आधारावर वैचारिक बैठक बसवा.

७. स्वप्नात “उसको हटाव उसको बिठाव” अशा घोषणा व “ढमके पुरस्कृत – अमके तिरस्कृत” हे प्रकार नसतात. फक्त असतात त्या वैयक्तिक शुभ व अशुभ या घटनांच्या सूचना.

——————-

नोव्हेंबर १९८९ला पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर वर्तमानपत्रातून परीक्षण, अनेक वाचकांचे पुस्तकाबद्दलचे मत, स्वप्न, स्वप्न्शास्त्र याबद्दलची पत्रे आलीत सर्वांच्याच बद्दल सांगणे किंवा लिहिणे शक्य नाही पण काही थोडक्यात…

वर्तमानपत्रे – दै.सन्मित्र – स्वप्नांच्या दुनियेत – एक वाचनीयग्रंथ श्री. मोहन पाठक, ठाणे यांनी स्तम्भ्लेखनातून निवृत्तीनंतर अभ्यासाचा विषय म्हणून स्वप्नांची निवड करण्याचा श्री. डोईफोडे यांचे या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. (दि. ९/९/९०)

‘स्वप्न’ – जिज्ञासू वाचकास आपल्या स्वप्नांचा अर्थ कसा लावला याविषयी मार्गदर्शन करणारे वाचनीय पुस्तक केवळ रु.२०/- (नागपूर पत्रिका – १२/८/९०)

मुंबई दिनांक – ८/४/९० – ‘स्वप्नसंबंधी मौलिक संशोधन’ – लेखकाने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वप्नांचा अर्थ लावणे सहज शक्य आहे. पुस्तक वाचनीय व वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन (लोकसत्ता)

स्वप्नांचे गूढ उलगडून दाखविणारे पुस्तक – स्वप्नांची दुनिया – लेखकाने आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाने या स्वप्न्शास्त्राचा उलगडा केला आहे. अभ्यास व लेखन दोन्ही ही गोष्टी अभिनंदनास पात्र आहे. – सौ. साठे (ग्रंथसहवास – १४/१/९०)

२ जानेवारी १९९४ – ‘स्वप्नसृष्टीचे ग्रांथिक अवलोकन’

‘मराठी साहित्य क्षेत्रात नवीन विषयावरील नवे पुस्तक म्हणून कौतुकास्पद’. यातील विवेचानाशी बुद्धिवादी सहमत होऊ शकणार नसले तरी क्षणभराकरिता स्वप्न्सृष्टीचे ग्रांथिक अवलोकन नक्कीच रंजक मानावे लागेल. पुस्तकातील चित्रांमुळे पुस्तक उठावदार झाले आहे.  डॉ. केनपुरे (लोकमत)

२७ दिसेम्बेर १९९७ – स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारे एक पुस्तक. स्वप्नांचा उलगडा करणारे व अर्थ सांगणारे मराठी भाषेतील एक वेगळे पुस्तक म्हणून कौतुकास्पद – प्रतिनिधी – दैनिक लोकमत – औरंगाबाद)

‘फ्राईडचे खंडण करणारी डोईफोडे यांची स्वप्नांची दुनिया’ – लेखकाने स्वप्न्शास्त्र एका दृष्टीक्षेपात सांगताना स्वप्नांची भीती बाळगू नका असा दिलासा दिला आहे. पुस्तक विवेचन अभ्यासपूर्ण म्हणून कौतुकास्पद परंतु आपल्या आपल्या पडलेल्या स्वप्नांचा अर्थ दिलेल्या कोषातून लपताना वाचकांना अंधविश्वासू बनू नये. – श्री. कुळकर्णी – श्रीमत दर्शन साप्ताहिक दि. १५-२२ २००४

——————-

वर्तमानपत्रे वृत्तपत्रे व मासिकांमधून अश्या प्रकारे परीक्षणे व समीक्षणे चापून आली. पुस्तके खरेदी करून वाचलेल्या वाचकांनी ताबडतोब आपल्या प्रतिक्रिया लिहून कळविल्यात त्यापैकी काही –

श्री. वा. रा. डोईफोडे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व परमार्थप्रवणता यांच्या सहवासात प्रत्यायात आली. ज्या ज्या लेखकांनी त्यापेक्षा वेगळे योग स्वतः निवडून मराठी सारस्वतात ‘स्वप्नांची दुनिया’ लिहून मोलाची भर घातली आहे. त्यांची प्रतिभाशाली कल्पकता आणि चौफेर वाचन याची साक्षही निर्मिती आहे – प्रा. श्री. व सौ. जोशी, नांदेड

डॉ. फ्राईडचे संशोधन आजचे निकष लावले तर सायंटिफिक नाही असे आजच्या मान्यता प्राप्त मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे तरी पण त्याला पूर्णपणे नाकारता येत नाही. ‘स्वप्ने हि भविष्यसूचक असतात’ असा आपला सिद्धांत व तो सिद्ध करण्यासाठी आपण काही उदाहरणे दिली आहेत. किंतु आपणही वापरात असलेली स्वप्नांचे अर्थ काढण्याची पद्धती ही पूर्ण पणे अचूक आहे असे म्हणता येत नाही. यासाठी आणखीन बरीच स्वप्ने अभ्यासण्याची गरज आहे. तरीसुद्धा आपण लिहिलेल्या या पुस्तकांमुळे मागे पडलेल्या स्वप्नशास्त्राच्या विषयाचा पुन्हा एखादा झाला. आपला प्रयत्न चांगला आहे पण अजून सविस्तर अभ्यास व्हावा – सौ. साधना कामत, मानसशास्त्रज्ञ, मुंबई

हैद्राबाद निवासी – उसमानिया विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख – प्रो.श्री.एस.आर.कुळकर्णी यांनी आपल्या १९९० सालच्या आपल्या पत्रानं ‘स्वप्नांची दुनिया’ या पुस्तकांबद्दल श्री. वा. रा. डोईफोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या पुस्तकाचा विषय व त्यासाठी केलेल्या प्रयत्नपूर्वक अभ्यासाचे श्री. कुळकर्णी यांनी पत्राद्वारे कौतुक केले. पुस्तकाचे वितरण ही लेखकाच्या दृष्टीने फार गरीब बनत चाललेली समस्या आहे आणि त्यात आपले पुस्तक व त्यात हाताळलेले विषय हा पण अत्यंत वेगळा विषय आहे.’ अशी काळजी पण या पत्रातून व्यक्त प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

‘स्वप्नांची दुनिया’ हे आपले पुस्तक संपूर्ण वाचले, आवडले व पटलेली माझ्या स्वप्नांचा पडताळासुद्धा आला. विशेष म्हणजे माझ्या संबंधित स्वप्नांविषयी आपल्या पुस्तकातील स्वप्नकोषातील स्वप्नदृश्य व स्वप्न्फल व दिलेले अनुभव आणि त्यानुसार मला मिळालेले उत्तर अगदी तंतोतंत जुळले. आपले पुस्तक खरोखरच योग्य मार्गदर्शन करणारे आहे, असे पत्राद्वारे श्री. भास्कर केवले जोगेश्वरी यांनी आपले या पुस्तकाचे मत कळविले होते.

आपले पुस्तक फारच आवडले. अत्यंत अभ्यास पूर्व आहे. खूप मेहनत घ्यावी लागली असेलच आपल्या मेहनतीबद्दल धन्यवाद ही स्वप्नांची दुनिया आपल्या स्वप्नांची पुरती करो ही सदिच्छा! – असे आपल्या पत्रातून श्री. एस. आर. पाटील, हिंगोली यांनी कळविले आहे.

अश्या प्रमाणेच श्री. बी. बी. लाखकर, हायकोर्ट वकील, औरंगाबाद, श्री. सुमेध रिसबूड, विलेपार्ले(पू.), श्री. प्रकाश चांदे, डोंबिवली, श्री. अ. ज. रोडे, वकील, हिंगोली, श्री. भाले, वकील, हिंगोली, श्री. एस. डी. देव, परभणी, श्री. एस. एच. शिरोडकर, पुणे आणि आणखीन बरेच या साऱ्यांनी ‘स्वप्नांची दुनिया’ एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी शास्त्र संमत, धरणी वाचनीय व भाषा प्रासादिक आहे. सहज सरळ व सराईत शब्दांमुळे पुस्तकाची भाषा शैलीदार व रोचक बनली आहे. आणखी एक वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट म्हणजे अत्यंत अभिनव विषयांतील एक अभिनव व एकमेव पुस्तक म्हणून विशेष अभिनंदन!


61 Comments

प्रस्तावना
मनोगत
माझी भूमिका
माझे आजोबा
स्वप्न विश्लेषण कशे करावे?
डॉ. सिगमंड फ्राईड – स्वप्नमीमांसा
सूचक स्वप्ने आणि स्वप्न्फल
स्वप्नदृश्य व स्वप्न्फल